
होळीसाठी ठाणे एसटी विभाग सज्ज
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : शिमग्याला चाकरमानी हे हमखास आपल्या गावी जातात. त्यामुळे नेहमीच चाकरमान्यांना सुखरूप सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ठाणे विभाग दर वर्षीप्रमाणे यंदाही सज्ज झाला आहे. या वेळी तब्बल ११४ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले असून ठाणे-२ या एकाच आगारातून सर्वाधिक ४१ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. २ ते ९ मार्च दरम्यान गाड्यांचे नियोजन असून चाकरमान्यांनी गावी जाताना आपले तिकीट आरक्षित करून सुखरूप प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
येत्या ६ मार्चला होळी आणि ७ मार्चला धुळवड आहे. त्यामुळे कोकणात होळीला जाणाऱ्यांची लगबग लक्षात घेता एसटीच्या ठाणे विभागाने कंबर कसली असून २ मार्चपासून जादा गाड्या सोडण्याचे नियोजन केले गेले आहे; तर ४, ५ आणि ६ मार्च रोजी जास्त जादा गाड्या सोडण्यावर भर दिला गेला आहे. त्या आठवड्यात ठाणे - १ आगारातून २१, ठाणे-२ आगारातून ४१, कल्याण आगारातून २० आणि विठ्ठलवाडी आगारातून ३० अशा ११४ गाड्या सोडण्यात येणार आहेत. या गाड्यांसाठी तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. चाकरमान्यांनी होळी सणाला जाण्यासाठी खिडकी तसेच ऑनलाईन पद्धतीने आरक्षण करून सुखरूप प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
..................................
या आगारांतून सुटणार या गाड्या
*ठाणे -१ - महाड, पाली, कावळा, पोलादपूर, चिपळूण, मंडणगड, दुर्गेवाडी-मंजूत्री, कासे माखजन, दापोली
*ठाणे-२ - शिरगाव, फौजी अंबावडे, चिपळूण, शिवथरघळ, बीरमणी, कोतवाल, दापोली, महाड, खापरपा, शिंदी, गुहागर, खेड, देवळी, भेदवाडी
*कल्याण - पोलादपूर, कोतवाल, दिवेआगार, फौजी अंबावडे, शिवथरघळ, खेड, चिपळूण, दापोली
*विठ्ठलवाडी - चिपळूण, तळीये, दापोली, ओंबळी, गुहागर, मुरुड, रत्नागिरी, काजूर्ली, कासे माखजन, गराटे वाडी, दापोली, साखरपा.