
कचराभूमीतील आगीवर नियंत्रण
भाईंदर, ता. १९ (बातमीदार) : उत्तन येथील धावगीच्या डोंगरावर असलेल्या कचराभूमीला शनिवारी लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला रात्री उशिरा यश मिळाले. मात्र रविवारीदेखील या कचराभूमीतून धूर निघत होता.
शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कचराभूमीतील उघड्यावर साठवण्यात आलेल्या कचऱ्याला भीषण आग लागली होती. ही आग एवढी भीषण होती, की ती लांब अंतरावरूनही दिसून येत होती. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या तीन गाड्या व एक टँकर घटनास्थळी दाखल झाले होते; पण आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण असल्याचे स्पष्ट होताच आयुक्त दिलीप ढोले यांच्या सू्चनेनुसार उपायुक्त मारुती गायकवाड यांनी अग्निशमन दलाची वाहने व कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्याबाबत अग्निशमन अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार एकूण आठ वाहने, सहा टँकर व ४७ कर्मचारी यांच्या मदतीने रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.