
४१२० किलो प्लास्टिक आठ महिन्यांत जप्त
मुंबई, ता. २० ः प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जातो; तरीही काही फेरीवाले प्लास्टिक विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. पालिकेने त्यांच्यावर कारवाई करत आतापर्यंत २२ जणांना न्यायालयात खेचले आहे. प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांवरील कारवाईत आठ महिन्यांत चार हजार १२० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून ४४ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गतवर्षी कोरोना नियंत्रणात आल्यानंतर १ जुलै २०२२ पासून प्लास्टिकविरोधातील कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली. कारवाईदरम्यान १ जुलै २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ पर्यंत ८८४ ठिकाणी भेट देऊन ४ हजार १२० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ४४ लाख २० हजारांचा दंड वसूल करण्यात आला. २२ प्रकरणांत न्यायालयीन कारवाई करण्यात आली आहे.
२३ पथकांच्या माध्यमातून कारवाईचा बडगा
मोहीम ठोसपणे राबविण्यासाठी मुंबई पालिकेचा परवाना विभाग, बाजार आणि दुकाने व आस्थापना विभागातील २५० अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी २३ पथकांच्या माध्यमातून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
आठ महिन्यांतील कारवाई
- ८८४ प्रकरणांत प्लास्टिक जप्त ः ४,१२० किलो
- २२ जणांविरोधात न्यायालयीन कारवाई
- वसूल दंड ः ४४,२०,००० रुपये