पवई तलावाचा सायलक ट्रॅकवर हातोडा पडणार

पवई तलावाचा सायलक ट्रॅकवर हातोडा पडणार

सायलक ट्रॅक तोडण्यासाठी ६६ लाख!
पवई तलाव परिसरातील कामासाठी पालिकेची निविदा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : पवई तलाव परिसरातील सायकल ट्रॅक काढून टाकण्यासाठी मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सायकल ट्रॅक हटवण्यासाठी तब्बल ६६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सायकल ट्रॅकचा प्रकल्प रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने याआधीच दिले होते. त्यानुसारच विभागाकडून कारवाईला सुरूवात झाली आहे. पर्यावरणवादी संघटनांच्या विरोधानंतर सायकल ट्रॅक हटवण्याच्या याचिकेवर न्यायालयाने निकाल दिला होता.
दरम्यान, करदात्यांच्या पैशातूनच अवैध ठरलेला सायकल ट्रॅक आता तोडण्यात येणार असल्याने आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे.

बांधकाम सुरू असलेला जॉगिंग आणि सायकल ट्रॅक मुंबई उच्च न्यायालयाने ६ मे २०२२ रोजी बेकायदा ठरवला होता. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कुठेही बांधकाम न करण्याचे निर्देशही मुंबई महापालिकेला दिले होते. त्या ठिकाणी केलेले बांधकाम तत्काळ हटवून तलाव क्षेत्र पूर्ववत करण्यास सांगितले होते. तसे न करता, महापालिकेने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आॅगस्ट २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

महाविकास आघाडीच्या काळात पवई तलाव परिसरातील आंबेडकर उद्यानालगत असलेल्या पाण्यात ५० मीटरहून अधिक लांबीपर्यंतचा खडी-दगडांचा भराव घालून सायकल ट्रॅकच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली होती. पवई तलाव परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या शेजारी असलेल्या पाण्यात मोठे दगड आणि खडी टाकून ५० मीटरहून अधिक लांबीचा आणि ६.५ ते ८ मीटर रुंदीचा भराव कोणताही विचार न करता घालण्यात आला. पवई तलावाचा परीघ ७.०६ किमी आहे आणि क्षेत्रफळ सुमारे १.३५ चौरस किमीचे आहे. बांधकामामुळे तलावाचे क्षेत्रफळ सुमारे चार टक्के कमी होणार होते. किनाऱ्यालगत असलेल्या परिसरात अनेक भारतीय प्रजातींची झाडे आहेत. विविध पक्ष्यांचा अधिवासही आहे. एवढेच नाही, तर मगरींसाठी प्रसिद्ध असलेल्या तलावात किनाऱ्यालगत बांधकाम करणे योग्य आणि पर्यावरणपूरक आहे का? याचाही विचार झाला नव्हता, असे निदर्शनास आले होते.

नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका
आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या सायकल ट्रॅकच्या ड्रीम प्रकल्पावर टीका केली आहे. अवैध बांधकाम ठरलेल्या पवई तलावानजीकचा सायकल ट्रॅक तोडण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सायकल ट्रॅक जनतेचे पैसे वापरून तोडण्यात येणार आहे. म्हणूनच आदित्य ठाकरे यांनी करदात्यांचे ६६ लाख रुपये परत करावेत, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. त्याबाबत एक ट्विट करून त्यांनी एक प्रकारे इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com