पालघर जिल्ह्यात पहिल्या दिवशी परीक्षा शांततेत

पालघर जिल्ह्यात पहिल्या दिवशी परीक्षा शांततेत

वसई, ता. २१ (बातमीदार) : बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून केंद्रावर विद्यार्थी व पालकांची गर्दी पाहावयास मिळाली. जिल्ह्यात पहिल्या दिवशी परीक्षा शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परीक्षा केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वसई, वाडा, जव्हार, मोखाडा, तलासरी, डहाणू, विक्रमगड व पालघर तालुक्यात एकूण ५४ केंद्रे निश्चित करण्यात आली होती. परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांची लगबग पाहावयास मिळाली. परीक्षेच्या वेळेनुसार विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश देण्यात आला, कॉपी होऊ नये म्हणून विशेष पथक तैनात होते. परीक्षेपूर्वी केंद्रावर कोणत्या वर्गात नंबर आला आहे हे पाहण्यासाठी धावपळ सुरू होती. जिल्ह्यात बारावी परीक्षा शांतातेत पार पाडण्यासाठी जिल्हा शिक्षण विभागाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

वाड्यात कडक सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा
वाडा (बातमीदार) : तालुक्यात चार परीक्षा केंद्रावर २,४१० विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. बोर्डाची परीक्षा सर्व केंद्रावर सुरळीत पार पाडावी, यासाठी तालुक्यातील सर्व परीक्षा केंद्रावर भौतिक सुविधांसह कडक सुरक्षा व्यवस्थेत पहिला पेपर सुरू झाला. पेपर सुरू होण्याच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना प्रघात यंदा बंद करण्यात आला.शिवाय परिक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात आले आहेत. एखाद्या केंद्रावर गडबड झाल्यास पोलिसांचा फौज फाटा ही तयार ठेवला आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

बोर्डीत केंद्रावर गर्दी
बोर्डी (बातमीदार) : बारावी शालांत परीक्षेसाठी सुनाबाई पेस्त मजी हकीमजी हायस्कूल केंद्रात ८६४ विद्यार्थी पहिल्या पेपरला बसले आहेत. गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित फिरोजाशा गोदरेज कनिष्ठ महाविद्यालयातून ५७३ विद्यार्थी विज्ञान व कला शाखेतून; तर ५६ विद्यार्थी एमसीव्हीसी शाखेतून परीक्षा देत आहेत. के.एम.ई. सोसायटी संचालित नॅशनल इंग्लिश जुनियर कॉलेजमधून १३१ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत; तर आचार्य भिसे शिक्षण संस्था संचालित कै. मालती भास्कर सावे कला व गायत्री देवी रामअवतार मोदी वाणिज्य शाखेतून १२१ विद्यार्थी, त्याचप्रमाणे आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाऱ्या अस्वली शाळेतून ३३ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत, अशी माहिती केंद्रप्रमुख हसनाले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com