
आंध्रप्रदेशात दर सेकंदाला तयार होतो एक मोबाईल फोन
आंध्रात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण!
मंत्र्यांच्या शिष्टमंडळाकडून मुंबईतील रोड शोदरम्यान महाराष्ट्राची स्तुती
सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २२ ः आपापल्या राज्यात गुंतवणूक खेचण्याच्या स्पर्धेत आता आंध्र प्रदेशनेही उडी मारली असून मार्चमध्ये होणाऱ्या गुंतवणूक परिषदेसाठी मुंबईतील उद्योगपतींशी त्यांच्या शिष्टमंडळाने नुकताच संवाद साधला. आमचे राज्य तीन वर्षे सातत्याने ईज ऑफ डुईंग बिझिनेसमध्ये प्रथम क्रमांकावर होते. ही आघाडी आम्ही कायम ठेवू, असा विश्वास उद्योगमंत्री गुडीवाडा अमरनाथ यांनी व्यक्त करत आंध्रात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे सांगितले.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात मोठी व्यवस्था आहे. देशाचा १४ टक्के जीडीपी महाराष्ट्र देतो; तर २० टक्के औद्योगिक उत्पादन या राज्यात होते. येथे आम्ही मार्गदर्शन घेण्यासाठी आलो आहोत. आज आंध्रात ८९ मोठे प्रकल्प सुरू आहेत. आम्ही भारतातील सर्वाधिक वेगाने प्रगती करणारे राज्य आहोत, असे गुडीवाडा यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्माण, एरोनॉटिक्स इत्यादी सर्वच क्षेत्रांत आम्ही अग्रेसर आहोत, असेही ते म्हणाले.
‘सकाळ’शी बोलताना अर्थमंत्री बुगन्ना राजेंद्रनाथ म्हणाले, की आमच्या राज्यात ४८ हजार एकरांची लॅण्ड बॅंक आम्ही तयार ठेवली आहे. कोणत्याही परकीय आणि देशी उद्योजकांसाठी आमच्याकडे जागा, पाणी आणि प्रशिक्षित मनुष्यबळ आहे. आमचे मुख्यमंत्री वाय. एस. आर. जगन रेड्डी हे नव्या युगातले नेते आहेत. शेतीप्रधान भागाच्या विकासाबरोबरच माहिती-तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात प्रगती करण्याचे धोरण आम्ही कायम शिरोधार्य मानले आहे. आमचा संघराज्य प्रणालीवर पूर्णपणे विश्वास आहे. केंद्र सरकारशी आमचे उत्तम संबंध आहेत. तेही आमच्याशी आदरपूर्ण व्यवहार करतात. आमच्या राज्यातील राजकीय स्थैर्यामुळे गुंतवणूकदार नि:शंकपणे आमच्याशी व्यवहार करतात. आयटी क्षेत्राचा विकास होतो आहे. आधुनिक तंत्रस्नेही वातावरण आम्ही निर्माण केले आहे.
मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी धोरण पायाभूत सुविधांचे जाळे आणि उत्तम प्रशासन यावर भर देण्याचे ठरवले आहे. भारतात नव्याने विकसित होणारी तीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स आंध्रात आहेत. शिवाय तिथे उभ्या राहणाऱ्या जागतिक दर्जाच्या श्रीसिटीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदार आंध्रात निधी गुंतवणे पसंत करत आहेत. आंध्र प्रदेशाने इलेक्ट्रिक वाहनांच्या उभारणीसाठी नवे धोरण तयार केले आहे. त्या अंतर्गत राज्यातील कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी इलेक्ट्रिक वाहने खरेदी केल्यास ती वापरण्यासाठी सवलत देण्यात येणार आहे, असेही सांगण्यात आले.
विविध गुंतवणूकदारांशी चर्चा
नगरविकासमंत्री आदिमुलम सुरेश म्हणाले, की आंध्रचे लोकाभिमुख धोरण गावागावात पोहोचले असून प्रत्येक तालुक्यात सरकारी यंत्रणेतल सात ते आठ अधिकारी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करत असतात. सीआयआयच्या सहकार्याने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या रोड शोमध्ये गुडीवाडा अमरनाथ आणि आदिमुलम सुरेश यांनी आंध्रात गुंतवणूक करण्यासाठी पोषक वातावरण आहे, असे सांगितले. आंध्रच्या शिष्टमंडळाने मुंबईतील विविध गुंतवणूकदारांशी चर्चा केली.