बुलेट ट्रेन बाधितांच्या मोबदल्यामध्ये तफावत

बुलेट ट्रेन बाधितांच्या मोबदल्यामध्ये तफावत

मनोर, ता. २७ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी जाहीर केलेल्या मोबदल्याच्या दरात मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे. चिल्हार-बोईसर रस्त्यावर मान आणि बोईसर ही गावे लागून आहेत, परंतु मान गावातील शेतकऱ्यांना बेटेगावच्या शेतकऱ्यांपेक्षा दुप्पट दर देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मान गावच्या शेतकऱ्यांना दिलेल्या दराप्रमाणे भूसंपादन मोबदल्याचा दर देण्याची मागणी बेटेगावच्या शेतकऱ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील मुंबई-अहमदाबाद या शहरांना जोडणाऱ्‍या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनाचे पालघर जिल्ह्यातील ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेन मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी निविदा लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये बुलेट ट्रेनचा १५५ किलोमीटर लांबीचा मार्ग प्रस्तावित आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील ७३ गावांमधील २७९ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले. बुलेट ट्रेन प्रकल्पात बाधित शेतकऱ्‍यांची जमीन, घरे, फळझाडांचा मोबदला देताना पक्षपातीपणा करण्यात येत असल्याचा आरोप बेटेगाव येथील आदिवासी शेतकऱ्यांनी केला आहे. भूसंपादन प्रक्रियेत संपादित जमिनीचे मूल्यांकन करताना मालमत्ता खरेदी-विक्रीचा कमाल दर अन्यायकारक असल्याचे शेतकऱ्‍यांनी म्हटले आहे.
बोईसर पूर्वेकडील चिल्हार-बोईसर रस्त्यावरील बेटेगाव, मान, वारांगडे, गुंदले आणि नागझरी या गावांचा झपाट्याने विकास होत आहे. या गावांमध्ये मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. असे असताना बेटेगावच्या संपादित जमिनीला हेक्टरी फक्त ७२ लाख रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. बेटेगाव पूर्वेकडील कमी विकसित असलेल्या कल्लाळे-मान गावाला मात्र हेक्टरी अडीच कोटी रुपयांचा दर देण्यात आला आहे. भूसंपादन प्रक्रियेत कल्लाळे-मान गावाला बेटेगावपेक्षा दुपटीहून अधिक दर दिला जात असल्याने बेटेगावच्या बाधित शेतकऱ्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. भूसंपादन प्रक्रिया राबवणाऱ्या यंत्रणेकडून अन्याय केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून मान गावाला लागून असलेल्या बेटेगावच्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्याची मागणी सक्षम अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
....
येत्या काळात अडचणींचा सामना
पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्प बाधितांच्या मोबदला वाटपात मोठा गोंधळ असल्याचे दिसून येत असून यामुळे भूसंपादन प्रक्रियेलादेखील उशीर होऊन केंद्र सरकारचे हजारो कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये मागील अनेक वर्षे संपादित जागेवर वहिवाटदार असलेले आदिवासी शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहिले असून सर्व मोबदला शहरांमध्ये राहत असलेल्या जमीन मालकांना देण्यात आल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवर प्रकल्पाचे काम सुरू करताना प्रशासनाला पुढील काळात मोठ्या अडचणींना तोड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
.....
मान हे गाव चिल्हार-बोईसर रस्त्याला लागून आहे, त्यामुळे भूसंपादन कायदा आणि भूसंपादन प्रक्रियेतील तरतुदीनुसार मान गावातील शेतकऱ्यांना अधिक दर देण्यात आला. बेटेगावमधील काही खातेदारांमध्ये वाद सुरू असल्याने भूसंपादनाची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना अदा आलेली नाही.
- धनाजी तोरसकर, उपविभागीय अधिकारी, पालघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com