
‘अनुभव निसर्गातील’, ‘निसर्गातील नवलकथा’चे प्रकाशन
वासिंद, ता. २५ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील पिवळी जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक, लेखक व निसर्ग छायाचित्रकार दामू शंकर धादवड यांच्या ‘अनुभव निसर्गातील’ व ‘निसर्गातील नवलकथा’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच वाडा येथे झाले.
ज्ञानदा प्रकाशन वर्धापनदिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी पां. जा. हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात हा पुस्तक प्रकाशन सोहळा झाला. यावेळी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कमिटी सचिव मनीष गणोरे, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, कृषीतज्ज्ञ तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघ प्रदेशाध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रकाश भांगरथ, ज्येष्ठ पत्रकार शरद पाटील, भाजप पालघर जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार, पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, जि.प. पालघर माजी उपाध्यक्ष निलेश गंधे, नगराध्यक्ष गितांजली कोलेकर, उपनगराध्यक्ष संदिप गणोरे, जि. प. सदस्य भक्ती वलटे, पंचायत समिती उपसभापती जगदीश पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ग्रामीण भागातील पिवळी शाळेतील उपक्रमशील शिक्षक धादवड यांनी सुट्टीच्या कालावधीत जंगल भटकंती करून केलेले छायाचित्रण तसेच पर्यावरण, प्राणी, पक्षी, वनस्पती याविषयीचे निरिक्षण, पर्यावरण रक्षण व वृक्षसंवर्धनासाठी उपाय योजना याविषयीचे अनुभव त्यांनी पुस्तकांत मांडले आहेत.