
३९९ रुपयांच्या नादात लाखोंचा फटका
नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर): मोबाईल रिचार्जसाठी बँक खात्यातून कट झालेल्या ३९९ रुपयांची रक्कम परत मिळवण्याच्या नादात एका सुरक्षा रक्षकाने तब्बल दोन लाख ६५ हजार रुपये गमावल्याची घटना तळोजामध्ये घडली आहे. या प्रकरणी सायबर चोरांविरोधात फसवणुकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळोजा येथील देवीचा पाडा येथे राहणारे देवेंद्रदेव तोंडरे येथे एका कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला आहेत. ४ फेब्रुवारी रोजी देवेंद्रदेव कामावर असताना, त्यांच्या जिओच्या सिम कार्डचे ऑटो रिचार्जमुळे खात्यातून ३९९ रुपये कट झाल्याचा मेसेज आला होता. त्यामुळे देवेंद्रदेव याने गुगलवरून जिओ कंपनीचा कस्टमर केअर नंबर मिळवून त्यावर संपर्क साधला. यावेळी समोरील व्यक्तीला मोबाईलच्या रिचार्जचे ३९९ रुपये आपोआप कट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा केली. हीच संधी साधत समोर असलेल्या सायबर चोराने देवेंद्रदेव याला एक लिंक पाठवली होती. या लिंकवर देवेंद्रदेवने बँकेचा अकाऊंट नंबर टाकला असता दोन बॅंक खात्यातील जवळपास दोन लाख ६५ हजारांची रक्कम काढून घेण्यात आली.
---------------------------
असा साधला चोरट्यांनी डाव
मोबाईलवर आलेला ओटीपी टाकल्याने अवघ्या काही सेकंदांत देवेंद्रदेव यांच्या खात्यातून एक लाख ६५ हजार रुपये वळते करण्यात आले. यावेळी सायबर चोराने देवेंद्रदेवला दुसऱ्या बँकेच्या खात्याची माहिती टाकण्यास भाग पाडत त्या खात्यामधील एक लाखाची रक्कम काढून घेतली होती. त्यामुळे रिचार्जसाठी गेलेले ३९९ मिळवण्याच्या नादात त्याच्या दोन्ही बँक खात्यातून जवळपास दोन लाख ६५ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याने या प्रकरणी तळोजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.