
महापालिका अधिकाऱ्यांकडून दंड वसूल करा
वसई, ता. २३ (बातमीदार) : वसई-विरार महापालिका प्रदूषण रोखण्यास असमर्थ ठरल्याने महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दंड ठोठावला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी जमा केलेल्या करातून हा दंड न भरता पालिका अधिकाऱ्यांकडून वसूल करावा. कारण अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे ठोठावण्यात आलेला भुर्दंड करदात्याने का भोगावा, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते अमित म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे.
शहरात घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रकल्प अद्याप उभारण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जल, वायू प्रदूषणात वाढ होत आहे. ही बाब महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने महापालिकेच्या नजरेस आणून दिली, परंतु तरीही कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने अखेर दररोज १० लाख रुपये दंड भरण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात केली आहे. एकीकडे विकासासाठी करदात्यांकडून कराच्या रूपाने पैसा येत असताना, दंडाची आर्थिक रक्कम ही करदात्यांच्या खिशातून जाणार असल्याने नागरिकांतून रोष निर्माण होऊ लागला आहे. वसईतील माहिती अधिकार कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांनी याबाबत जनहित याचिका दाखल करावी, असेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.