बेस्ट बसेस

बेस्ट बसेस

बेस्ट तुटवड्याने मुंबईकरांचे हाल
वेळापत्रक बिघडल्याने तासन् तास खोळंबा


सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : गेल्या १५ दिवसांत बेस्टच्या कंत्राटदारांकडून चालवण्यात येणाऱ्या तीन एसी बसना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी बेस्ट प्रशासनाने मे. मातेश्वरी कंपनीकडून चालविण्यात येणारी सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ४०० सीएनजी बस थांबवण्यात आल्याने आज दिवसभर मुंबईतील विविध बसमार्गांवर गाड्यांचा तुटवडा जाणवला. तुटवडा भरून काढण्यासाठी बेस्टने आपल्या ताफ्यातील २९१ बस आज रस्त्यावर उतरवल्या. मात्र, मुंबईकरांचे बेस्ट बस प्रवासाचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांची तासन् तास फरपट झाली.
दरम्यान, आठवड्याभरात बसचा दोष दूर करण्याचे आश्वासन कंत्राटदाराने दिले आहे.
बेस्टच्या मे. मातेश्वरी कंपनीकडून चालविण्यात येणारी सेवा थांबवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रूझ आणि मरोळ बस आगारांवर झाला. चारही आगारांतून होणारी बस सेवा पूर्णपणे कोलमडली. परिणामी सकाळपासूनच आगारांसह बसथांब्यांवर प्रवाशांची गर्दी झाली होती. बऱ्याच ठिकाणी प्रवासी आणि आगार नियंत्रक यांच्यामध्ये वादावादीही झाल्याचे पाहायला मिळाले. बेस्ट उपक्रमाच्या तब्बल ३६ मार्गांवर बसच्या तुटवड्याचा परिणाम पाहायला मिळाला. बेस्टने आपल्या विविध आगारांतून बस आणत त्या ३६ मार्गांवर चालवल्या खऱ्या; पण तुटवड्याचा फटका मुंबईकरांना बसला.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट उपक्रमाने आज सकाळपासून त्यांच्या इतर ताफ्यातील २९१ बस विविध बसमार्गांवर आवश्यकतेनुसार चालवल्या. त्यामुळे वेगवेगळ्या बसमार्गांवर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, तरीही बसचे वेळापत्रक कोलमडल्याचे दिसले. प्रवाशांना आपली आवश्यक बसची वाट बघत ताटकळत राहावे लागले.

मे. मातेश्वरी कंपनीकडून चालविण्यात येणाऱ्या बसना आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. परिणामी कंत्राटदार व बस निर्मात्यांनी आवश्यक बदल आणि योग्य उपाययोजना करीपर्यंत तसेच भविष्यात अशा घटना न होण्याची खबरदारी घेईपर्यंत बेस्ट उपक्रमाने सर्व ४०० बसगाड्या न चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

आठवड्याभरात बसचा दोष दूर करण्याचे उद्दिष्ट
टाटा मोटर्सच्या इंजिनिअरिंग विभागाच्या लखनौतील टीमने बसची तपासणी करायला सुरुवात केली आहे. सुरक्षा मानके आणि निकषांच्या आधारावर सर्व बसची पडताळणी यानिमित्ताने सुरू झालेली आहे. सर्व तपासणीला सहा ते सात दिवसांचा कालावधी लागणाार आहे. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांचे हित लक्षात घेऊनच बसच्या सुरक्षेबाबत प्राधान्याने विचार करण्यात आला आहे. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत बेस्ट प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com