
मीटर काढल्यानंतरही विजेची चोरी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ : थकीत बिलापोटी वीजपुरवठा खंडित करून, मीटर काढल्यानंतरही वीजचोरी होत असल्याची बाब उघड झाली आहे. महावितरणच्या टिटवाळा उपविभागात वीजचोरी करणाऱ्या १०१ जणांविरोधात मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महावितरणच्या पथकाने टिटवाळा, गोवेली व खडवली परिसरात धडक कारवाई करून ३३ लाख ७८ हजारांची वीजचोरी उघडकीस केली आहे.
थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी करण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा उपविभागात तपासणी मोहीम राबवण्यात आली. टिटवाळा शाखा कार्यालयांतर्गत मौर्या नगर, वैष्णवी चाळ, रेणुका नगर चाळ, जयशंकर चाळ, जाधवनगर चाळ, गोवेली रोड, टिटवाळा व बल्याणी परिसरात १६ ग्राहकांकडे पाच लाख ३९ हजार रुपयांची वीजचोरी आढळली. गोवेली शाखा कार्यालयांतर्गत बेलकर पाडा, आदिवासी वाडी, मुम्हसरुंडी, मामनोली, कुंदे, रायते, भिसोळ, नालिंबी, घोटसर, म्हारळ, वरप, नवगाव, कोलम परिसरात ७० ग्राहकांकडे सुरू असलेली १४ लाख २९ हजार रुपयांची वीजचोरी पकडण्यात आली; तर खडवली शाखा कार्यालयांतर्गत फळेगाव भागात १५ ग्राहकांकडे १४ लाख १० हजार रुपयांची वीजचोरी आढळली.