
कोपरीगाव ग्रामस्थांच्या संघर्षाला यश
तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : कोपरी गावातील स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी बांधावी, यासाठी ग्रामस्थांच्या वतीने पाच वर्षांपासून महापालिकेसोबत संघर्ष सुरू होता. या संघर्षाला अखेर यश आले असून, पालिकेने या ठिकाणी नवीन स्मशनभूमी बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचे संकल्प चित्र तयार करण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती पालिका अभियंत्यांनी दिली आहे.
कोपरी गावात पुरातन अशी स्मशानभूमी आहे. कालांतराने महापालिकेने १९९८-९९ मध्ये तिची सुधारणा केली. त्यानंतर २०१५ ला लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार कोपरी गावासाठी उड्डाणपुलाशेजारी स्मशानभूमी मंजूर करून ती बांधण्यात आली. मात्र, उड्डाणपुलाशेजारी स्मशानभूमीची मागणी ही ग्रामस्थांना विश्वासात न घेता करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थ आजही गावातील जुन्या स्मशानभूमीसाठी आग्रही आहेत. त्याच ठिकाणी अंत्यसंस्कार पार पाडले जात आहेत. गावातील जुनी स्मशानभूमी हटवण्यास विरोध केला असून, तसा ठराव ग्रामस्थ मंडळाने २०१८ मध्ये एकमताने मंजूर केला आहे. तेव्हापासून जुन्या स्मशानभूमीच्या देखभाल दुरुस्तीची मागणी करत आले आहेत. अखेर या मागणीला यश आले आहे. स्मशानभूमी बांधण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. त्यासाठी संकल्प चित्र तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच्या खर्चाची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे हे काम आता प्रत्यक्षात होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
-----------------------------------------
कोपरी गावातील स्मशनभूमी बांधण्याचे काम प्रस्तावित आहे. त्याचे संकल्प चित्र बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. ते तयार झाल्यानंतर आयुक्तांची मंजुरी घेऊन निविदा प्रकिया राबवली जाईल.
- संजय पाटील, कार्यकारी अभियंता,
तुर्भे विभाग, नवी मुंबई महापालिका
-----------------------------------------
कोपरी गावातील स्मशानभूमी आहे त्या ठिकाणी बांधण्याची मागणी सर्व ग्रामस्थांनी ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीत एक मताने केली होती.यासाठी मागील पाच वर्षापासून संघर्ष सुरू होता. त्यामुळे हे यश सर्व ग्रामस्थांचे आहे.
परशुराम ठाकुर,
अध्यक्ष, कोपरी गाव वेल्फेअर असोशियन,(ग्रामस्थ मंडळ)