
मराठी भाषादिनानिमित्त ‘शब्दोत्सव’
दिवा, ता. २६ (बातमीदार) : मराठी भाषादिनानिमित्त सोमवारी (ता. २७) स्वामीराज प्रकाशन, श्रीरंग थिएटर, डोंबिवली आणि कल्याण काव्य मंचच्या सहकार्याने ‘शब्दोत्सव’ हा मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. कल्याण महिला मंडळ सभागृहात हा महोत्सव सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत रंगणार आहे.
सलग १० तास, ८० कलावंत मराठी साहित्यातील निवडक कथा, कविता, कादंबरी, नाटक आदींचे अभिवाचन करणार आहेत. या महोत्सवात कल्याण काव्य मंच, श्रीरंग थिएटर-डोंबिवली, कल्याण सार्वजनिक वाचनालय, अभिव्यक्ती-ठाणे, साहित्य गंध-कल्याण, चार मित्र-कल्याण, विवक्षा-कल्याण, सफल-कल्याण, नाट्य रसिकहो-कल्याण, मंच मंथन-डोंबिवली, आकांक्षा क्रिएशन-कल्याण या संस्थांचे अभिवाचक सहभाग नोंदवणार आहेत.
महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध मालिका दिग्दर्शक राजू सावंत यांच्या हस्ते होणार आहे.
गझलकार प्रशांत वैद्य, भिकू बारस्कर, सुप्रसिद्ध रंगकर्मी सुनील देवळेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व वि.वा. शिरवाडकर अर्थात ‘कुसुमाग्रज’
यांचा जन्म दिवस म्हणजेच मराठी राज्यभाषा दिन म्हणून उत्स्फूर्तपणे संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होतो. दर महिन्याच्या २७ तारखेला महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर कुठल्याही शहरात, गावात जाऊन मराठी माणसांना एकत्र करत, त्यांच्यासाठी मराठीतून सादरीकरण होते. कोल्हापूर येथून या उपक्रमाला सुरुवात झाली आणि ही वारी कणकवली, गोवा, मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, शिर्डी, बेळगाव, नालासोपारा, कल्याण, कुडाळ येथे गेली आहे.
----------------------------------------
साहित्यप्रेमींना आवाहन
समस्त कल्याण, डोंबीवलीकर रसिक आणि साहित्यप्रेमींनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा करावा, असे आवाहन आयोजक आणि महोत्सव संयोजक यांनी केले आहे. कल्याण महिला मंडळ, बाजारपेठ मार्ग, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर जवळ, कल्याण पश्चिम येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
--------------------------------------------
कल्याणमध्ये एक झाड एक कविता
कल्याण (बातमीदार) : बी. के. बिर्ला महाविद्यालयाचा मराठी विभाग आणि मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने सोमवारी मराठी राजभाषा गौरवदिन साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती बिर्ला कॉलेज मराठी विभाग प्रमुख डॉ. सीताराम म्हस्के यांनी दिली. या वेळी एक झाड एक कविता या संकल्पनेखाली १०० मुलांकडून शंभर विविध कवींच्या कविता लिहून आणून त्या झाडाला बांधण्यात येणार आहेत.