
केईएमच्या सेवासक्षमेतसाठी एमबीए व्यवस्थापकांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : व्यवस्थापन कौशल्यामुळे केईएम रुग्णालयातील सेवा कार्यक्षमपणे राबवण्यास मदत झाली आहे. व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून सहा एमबीए पदवीधारकांची १६ जानेवारी या दिवशी निवड केली गेली. या एमबीए पदवीधारकांनी एका महिन्याच्या काळात केलेल्या वेगवेगळ्या सूचनांमुळे इतर सेवांसोबत आपत्कालीन विभाग आणखी सक्षमपणे सेवा देत आहे.
स्टाफ कर्मचाऱ्यांची नेमकी भूमिका काय, यासह रुग्णांसोबत फक्त एक नातेवाईक तसेच ट्राली आणि व्हिलचेअरचे व्यवस्थापन या सर्वांसाठी सूचना या एमबीए व्यवस्थापकांकडून दिल्या गेल्या आहेत. त्यावर त्यांचे कामही सुरू आहे, असे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.
केईएम रुग्णालयात ५ हजार रुग्ण दररोजच्या ओपीडीत येतात. त्यापैकी अनेकांना आपत्कालीन विभागात जावे लागते. कारण रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी सही आणि स्टॅम्पसाठी त्यांना ईएमएसमध्ये पाठवले जाते; तसेच रक्ततपासण्या आणि रेडिलॉजिकल स्कॅनसाठी ईएमएस विभागात जावे लागते. मात्र इथेही जवळपास ५०० ते ८०० जण असतात. अपघात आणि स्ट्रोकचे रुग्ण इथेच येतात.
एमबीए व्यवस्थापकांना पहिल्यांदा हे जाणवले की, एखादा रुग्ण येताना त्याच्यासोबत चारपेक्षा जास्त नातेवाईक किंवा मित्रमंडळी असतात. तसेच अनेकदा रुग्णासाठी घेतलेल्या ट्रॉलीही वॉर्डच्या बाहेर सोडून दिलेल्या असतात.
...
सह्यांबाबत सूचना
रुग्णांना ओपीडीतून रक्ततपासण्या, स्कॅनिंगसाठी प्रयोगशाळेत जाण्यापूर्वी डॉक्टरांच्या सह्या घ्याव्या लागतात. त्यासाठी त्यांना पुन्हा ईएमएसमध्ये यावे लागते. ते तसे न करता ओपीडीतील वरिष्ठ डॉक्टरांनीच सह्या केल्या; तर ईएमएसमध्ये जायची गरज नाही. त्यामुळे ईएमएसमधली गर्दी कमी होण्यास मदत होईल, अशी सूचना आम्ही अधिष्ठातांना केली असल्याचे सर्व्हिस मॅनेजर सुफियान सिद्दिकी यांनी सांगितले. हिमोफिलिया आणि थॅलेसेमिया रुग्णांनाही संबंधित वॉर्डमध्येच सह्या दिल्यास ईएमएसवरचा भार कमी होऊ शकतो.