
शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आजपासून उपोषण !
विक्रमगड, ता. २७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंगळवार (२८ फेब्रुवारी)पासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत. या उपोषणास जिजाऊ संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, पालघरवासी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
पालघर जिल्ह्याची निर्मिती आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी झाली; परंतु प्रत्यक्षात आदिवासी बांधवांच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार, वीज, पाणी व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या याबाबत प्रशासनाकडून उदासीनता दिसून येत आहे. पालघर जिल्ह्यातील बहुतांश आदिवासी व दुर्गम डोंगराळ भागात अनेक धरणे आदिवासी उपाययोजनेतून बांधण्यात आली आहेत; पण येथील आदिवासींसह अनेक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत वारंवार बैठका, आंदोलने करूनही त्यांना न्याय मिळू शकला नाही. आता आदिवासी समाजासह शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जिजाऊ संघटनेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे हे मंगळवारपासून बेमुदत उपोषण करणार आहेत.