
भाषा संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र या
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : ज्ञानाचा साठा आत्मसात करण्याची कुवत आपल्या मराठी भाषेमध्ये आहे. या भाषेचे संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहामध्ये मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक व कवी रघुनाथ बापू देशमुख उपस्थित होते.
या वेळी तसेच उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, तहसीलदार राजाराम तवटे, नायब तहसीलदार स्मितल यादव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व शासकीय कामकाज मराठीमधून करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आपण सर्वजण काम करत आहोत. कोणतेही ज्ञान हे आपल्या मायबोली भाषेतून समजून घेतले तर त्याचे आकलन लवकर होते. मराठी ग्रंथसंपदा एवढी मोठी आहे की, आपण ती शिकत मोठे झालो आहोत. आपण सर्वजण मराठी भाषा जाणणारे व सवर्धन करणारे आहोत. आपले दैनंदिन कामकाज मराठी भाषेतून करण्याचे आवाहनही शिनगारे यांनी केले.