वायू शुद्धीकरण यंत्राचा प्रभाव मर्यादित

वायू शुद्धीकरण यंत्राचा प्रभाव मर्यादित

विरार, ता. १ (बातमीदार) : वसई-विरार शहरात बसवण्यात आलेल्या वायू शुद्धीकरण यंत्रांचा प्रभाव त्या जागेपुरताच मर्यादित असल्याने त्याऐवजी वृक्षलागवडीसारख्या अन्य उपाययोजना कराव्यात, असे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वसई-विरार महापालिकेला दिले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील सहा यंत्रे बसवण्याच्या निर्णयाला पालिकेने स्थगिती दिली असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हवा शुद्धीकरण कार्यक्रमांतर्गत वसई-विरार महापालिकेला १६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. या निधीतून पालिकेच्या वाहन, उद्यान व बांधकाम विभागाच्या माध्यमातून वेगवेगळी कामे हाती घेण्यात आलेली आहेत. त्यात बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरात १२ ठिकाणी वायू शुद्धीकरण यंत्रे बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सहा व मार्च २०२२ नंतर उर्वरित सहा वायू शुद्धीकरण यंत्रे बसवण्याची कार्यवाही करण्यात येणार होती. त्यासाठी विरार पूर्व, आर. जे. चौक, तुळिंज पोलिस चौकी, वसई-अंबाडी चौक, संतोष भुवन नाका, नारंगी चौक, रेंज ऑफिस नाका, गोलानी नाका, वसई रेल्वे स्थानक (पूर्व), वसई पेल्हार फाटा, वसई पापडी मार्केट, विरार जुना जकात नाका आणि विरार पूर्व रेल्वे स्थानक अशी १२ ठिकाणे पालिकेने निश्चित केली होती. पहिल्या टप्प्यात यातील सहा ठिकाणी ही यंत्रे बसवण्यात आली आहेत.

----------------------
कंपनीला २१ लाखांचे बिल अदा
कर्नाटकातील स्थित मे. ॲटेक्ट्रॉन कंपनीने ही यंत्रे बसवली असून एक वर्षाची देखभाल-दुरुस्तीही ते करणार आहेत. या एका यंत्राकरिता पालिकेला ३ लाख ५६ हजार इतका खर्च आलेला आहे. या शुद्धीकरण यंत्रात तीन फिल्टर आहेत. पहिल्या स्तरात गाड्यांच्या वर्दळीमुळे उडणारे धुळीचे कण हवेतून विलग होतात. दुसऱ्या टप्प्यात एम-१० पार्टीकल्स; तर तिसऱ्या टप्प्यात ऑईल म्हणजेच एम-२.५ पार्टिकल्सचे विलग होऊन शुद्ध हवा वातावरणात सोडली जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आलेले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व वसई-विरार महापालिकेच्या पाहणीत ही यंत्रे तितकीशी प्रभावी निघालेली नाहीत. विशेष म्हणजे या सहा यंत्रांचे २१ लाख ३६ हजार रुपयांचे बिल पालिकेने मे. ॲटेक्ट्रॉन कंपनीला अदा केलेले आहे.

================
वसई-विरार पालिकेने शहरात लावलेल्या वायू शुद्धीकरण यंत्राचा प्रभावी फायदा होत नसल्याचे दिसून आले आहे. आम्ही आता शहरात मोठी शुद्धीकरण यंत्रे मागवत आहोत. त्यामुळे शहरातील प्रदूषण रोखण्यास फायदा होणार आहे.
- किशोर गवस, उपायुक्त, वसई-विरार महानगरपालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com