दहावीचे एक लाख १६ हजार विद्यार्थी

दहावीचे एक लाख १६ हजार विद्यार्थी

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : दहावी शालांत परीक्षांना गुरुवार २ मार्चपासून सुरुवात होत आहे. मागील वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शाळेमध्येच परीक्षा घेण्यात आल्या होत्या; मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यामुळे विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यानुसार केंद्रदेखील निश्चित करण्यात आली आहेत. यंदा ठाणे जिल्ह्यातून एक लाख १६ हजार ५४२ विद्यार्थी बसणार असून, ३३२ केंद्रे निश्चित करण्यात आली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.

मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच क्षेत्रांवर निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यावरदेखील निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे गतवर्षी प्रत्येक शाळांमध्येच परीक्षा केंद्रांची व्यवस्था करून शाळांमध्येच परीक्षा घेण्यात आल्या होत्या; मात्र यंदाच्या वर्षी परीक्षांसाठी ३३२ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे शनिवारपासून केंद्राचा शोध घेण्यासाठी विद्यार्थी फिरत असल्याचे दिसून आले.
------------------------------------
भरारी पथकाची नियुक्‍ती
यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून एक लाख १६ हजार ५४२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकरी आणि ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथके नेमण्यात आली असून प्रत्येक पथकात चार अधिकारी असणार आहेत. यामध्ये एका महिला अधिकाऱ्याचादेखील समावेश असल्याची माहिती शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.
...........................
परीक्षा केंद्रावर तयारीची लगबग
गुरुवारपासून दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यामुळे सोमवारपासूनच परीक्षा केंद्र असणाऱ्या प्रत्येक विद्यालयात त्यासंबंधी तयारीची लगबग पाहायला मिळाली. या वेळी कोरोना महामारीनंतर परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असल्यामुळे शाळेतील बाकावर नंबर टाकणे, विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करणे, विद्यार्थ्यांची केंद्र शोधण्यासाठीची लगबग सुरू असल्याचे चित्र दिसून आले.
................................
कॉपीमुक्त परीक्षा
ठाणे जिल्ह्यात गुरुवारपासून दहावीच्‍या परीक्षांना सुरुवात होणार आहे. कोरोना महामारीनंतर परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. त्यामुळे ही परीक्षा कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात द्यावी, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
.............................
परीक्षा केंद्र
जिल्ह्यातील विविध भागांत ३३२ परीक्षा केंद्रे असणार आहेत. यामध्ये ठाण्यात ७३, नवी मुंबईत ३९, कल्याण ८८, उल्हासनगर २२, अंबरनाथ २२, मुरबाड १०, शहापूर ९, भिवंडी ४२ आणि भाईंदर येथे २१ परीक्षा केंद्रे असणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com