
होळीसाठी चाकरमान्यांचा गावाकडे कूच
माणगाव, ता. ५ (बातमीदार)ः शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यातील नोकरदार वर्ग, भाविकांनी गावाकडे कूच केली आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव, इंदापूर शहरातील नाक्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
होळीनिमित्त सलग तीन दिवस सुट्टी असल्याने मुंबई, तसेच उपनगरातील चाकरमानी गावाकडे निघाला आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर गेल्या दोन दिवसांपासून वाहनांची संख्या वाढली असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत आहे. माणगाव तसेच इंदापूर परिसरात बाजारपेठेतूनच महामार्ग जात असल्याने कोंडी होत असल्याचे चित्र आहे. सायंकाळी वर्दळीच्या वेळेत रस्त्याच्या दोन्ही बाजूस एक ते दोन किलोमीटर लांब वाहनांची रांगा लागत आहेत, तर माणगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून माणगावपासून खरवली फाट्यापर्यंत तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. शिमगोत्सवासाठी गावाकडे निघालेल्या चाकरमान्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे.
------------------------------------------------
मुंबई-गोवा महामार्गावरील शहरांमधील बाजारपेठांमध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. सणांच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील ही वाहतूक कोंडी नित्याची बाब झाली आहे, पण शिमगोत्सवासाठी हा त्रास सहन करण्याची तयारी आहे.
- मंगेश खडतर, प्रवासी