
वासिंदजवळ अपघातात दोघांचा मृत्यू
वासिंद, ता. ७ (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावर खातिवली गावाजवळ दोन दुचाकीस्वारांना एका टँकरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोन जणांचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी १ वाजण्यच्या सुमारास शहापूरकडून वासिंद शहराकडे येणाऱ्या दोन मोटरसायकलना नाशिककडून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका टॅंकरने मागून जोरदार धडक दिल्याने या दुचाकीवरील गजानन हरिश्चंद्र काठोळे (वय ५१) व कैलास भेरे (वय २२) या दोन व्यक्ती गंभीर दुखापतग्रस्त झाल्या होत्या. त्यांना शहापूर उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले, परंतु उपचारांपूर्वीच त्यांचे निधन झाले. याबाबत वासिंद पोलिस ठाण्यात अपघात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अपघातानंतर पळून गेलेल्या टँकरचालकाला पडघा टोल नाक्याजवळ पकडण्यात आले. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेश बोलके व पोलिस हवालदार महेश वाघ करत आहेत. दरम्यान, या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांच्या मालिकांमुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.