पावसाचा ‘शिमगा’

पावसाचा ‘शिमगा’

वसई, ता. ७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात फूल, भाजीपाला, बागायतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. नैसर्गिक संकटामुळे अनेकदा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, जोरदार वारा व अवेळी आलेल्या पावसाने बागायतीवर मोठा परिणाम होत आहे. आंब्याला आलेला मोहोर गळू लागला आहे. काही भागांत कैरी, फुलशेती, भाजीपाला, पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्‍हा एकदा संकटात सापडला आहे.

वसई, विक्रमगड, वाडा, मोखाडा, जव्हार, डहाणू, तलासरी, बोईसर, नालासोपारा, पालघरमध्ये मोठ्या प्रमाणात भातशेती, चाफा, जास्वंद, मोगरा, जाई, कागडा फुलशेती, आंबा, चिकू फळांची लागवड तसेच पालक, फ्लॉवर, ढोबळी मिरची, काकडी, भेंडे, दुधी, मेथी, लाल माठ, वांगी, वालपापडी, घेवडा यांसह विविध भाजीपाल्याची लागवड केली जाते. यासाठी जमिनीच्‍या मशागतीपासून ते पीक येईपर्यंत मेहनत व खर्च करावा लागतो, परंतु यंदा अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. दोन वर्षे कोरोना काळात फुलशेतीवर आर्थिक संकट ओढवले होते. त्यातच अवेळी पाऊस आल्याने बागायतीवर परिणाम झाला. पालघर जिल्ह्यातील शेतकरी प्रगतशील आहे. नवनवीन प्रयोग करून पीक घेत असताना नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे.
--------------------------------
नैसर्गिक संकटांची मालिका
एकीकडे पालघर जिल्ह्यात नुकतीच १० लाख फळझाडे लावण्याचा निर्धार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना व्यवसायाचे साधन निर्माण होईल. यामध्‍ये काजू, फणस, आंबा, चिकू जातीच्या झाडांचा समावेश आहे. याचा लाभ पाच हजार शेतकऱ्यांना होणार आहे; मात्र अशा प्रकारे नैसर्गिक संकट वारंवार ओढू लागले तर बागायतदारांना मिळालेल्या उत्पन्नाच्या आनंदात विरजण पडणार आहे.
------------------------
लोणचे, आंबा महागणार
आंबा उत्पादक मोठ्या प्रमाणात आहेत. कृषी विभागाकडूनदेखील आंबा लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. आंब्याला मोहोर फुलला होता; मात्र पावसामुळे तो पडत आहे. परिणामी फळधारणेचे प्रमाण कमी होणार आहे. लोणच्यासाठी कैरीची विक्री केली जाते. आंबादेखील बाजारपेठेत विक्रीसाठी येत असतो, परंतु अवेळी पावसाने घात केला असून यंदा मागणीपेक्षा उत्पादन कमी होणार असून, लोणचे व आंब्‍याचे दर वधारण्याची शक्यता आहे.
--------------------------
दोन ते तीन दिवस अवेळी पाऊस झाला तर याचा परिणाम फुलशेतीवर होऊ शकतो. भाजीपाल्याला किडीचा प्रादुर्भाव होत असून, आंबा मोहोर गळण्‍याची शक्‍यता असून, शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे.

- किरण पाटील, अध्यक्ष, अर्नाळा शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी
--------------------------
कांदा यंदाही रडवणार
पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड एकूण २०० हेक्टरवर केली आहे. काही प्रमाणात पीक आले आहे; मात्र पिकाखाली आलेल्या जमिनीत अवेळी पावसाने शिरकाव केला असल्याने गाभ्यावर किडीचा हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेले पीक निसटणार असल्याने कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणार आहे. सध्या बाजारात आलेला पांढरा कांदा हा २८० रुपये प्रती माळ असा विक्री केला जात आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात १७० रुपयांनी विक्री होत होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com