
‘जिल्ह्याच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद करा’
पालघर, ता. ८ (बातमीदार) : पालघर जिल्हा हा सागरी, नागरी, डोंगरी आणि शहरी अशा चार विभागांत विभागला गेला आहे. या चारही विभागांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. त्या दृष्टीने शासनाने इथल्या जनतेचा विचार करून त्यासाठी आवश्यक असलेला निधी त्याचप्रमाणे वाढती लोकसंख्या लक्षात घेता शैक्षणिक साधने उपलब्ध करावीत, अशी मागणी बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी विधानसभेमध्ये अर्थ विषयक संकल्पाच्या वेळी केली. बोईसर विधानसभा क्षेत्रामध्ये व जिल्ह्यातील इतर भागांत मोठ्या प्रमाणात आदिवासी पाडे आहेत; मात्र बऱ्याच ठिकाणी आतापर्यंत दळणवळण यंत्रणा पूर्णपणे पोहचू शकलेली नाही. नद्या, नाले पार करून इथल्या नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात प्रवास करताना त्यांना फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, यासाठी पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करावी, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली आहे.