
अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा
बोर्डी, ता. ८ (बातमीदार) : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेती व बागायतीच्या नुकसानीची पाहणी करण्याकरता तलासरी तालुक्यातील कृषी विभागाच्या झरीमंडळ कार्यक्षेत्रात पाहणी दौरा सुरू करण्यात आला. होळीच्या दिवशी अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे करावेत, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर कृषी विभागाने तातडीने पाहणी दौरे सुरू केले आहेत. कृषी अधिकारी सुनील बोरसे, कृषी पर्यवेक्षक एम. बी. गावड व कृषी सहायक एल. डी. भोये या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. झाई येथील बागायतदार संदीप ठाकूर यांच्या बागेमध्ये या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. अवकाळी पावसामुळे बागायतीत झालेल्या नुकसानीचा तातडीने आढावा घेतला. या दौऱ्याच्या वेळी अवकाळी पावसामुळे २५ ते ३० टक्के फळे अकाली पिकून पडली असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहेच; परंतु पुढील हंगामात उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होईल, अशी शक्यता संदीप ठाकूर यांनी कृषी अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली.
-------------------------
बोर्डी : बागायतीचे पंचनामे करताना कृषी पर्यवेक्षक एम. बी. गावड, कृषी सहायक एल. डी. भोये, बागायतदार संदीप ठाकूर व कृषी मंडळ अधिकारी सुनील बोरसे.