
मुंबईला सलग सहाव्यांदा सर्वोत्कृष्ठ विमानतळाचा पुरस्कार
मुंबई, ता. ८ : एअरपोर्टस् कौन्सिल इंटरनॅशनलचा प्रतिष्ठित पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला सलग सहाव्यांदा मिळाला. २०२२ मध्ये आशिया प्रशांत प्रदेशातील ‘४० लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करणारे सर्वोत्कृष्ट विमानतळ’ म्हणून मुंबई विमानतळाला मान मिळाला आहे.
देशातील सर्वाधिक व्यग्र विमानतळांपैकी मुंबई विमानतळाची ओळख आहे. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर विमान प्रवासावरील निर्बंध हटवण्यात आले. परिणामी, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. तसेच मध्यंतरीच्या काळात मुंबईहून नव्या मार्गांवरील सेवा, वाढत्या उड्डाणांच्या हालचाली आणि विमानसेवेच्या क्षमतेत वाढ झाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी मुंबई विमानतळ प्राधिकरणाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘इंटिग्रेटेड सिक्युरिटी चेक पॉइंट’ सुरू केले आहेत. ई-वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध केली. जलद प्रवासासाठी २ डी बारकोड रीडर लावले आहेत. दरम्यान, २०२१ मध्ये एअरपोर्टस कौन्सिल इंटरनॅशनलद्वारे मुंबई विमानतळाला ‘द व्हॉईस ऑफ द कस्टमर’चा किताब मिळाला होता.