
पोलिस ठाण्यांना अग्निधोका
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. ९ : कारवाईत जप्त केलेल्या अनेक गाड्या पोलिस ठाण्यांच्या आवारात उभ्या असतात. केवळ पोलिस ठाणेच नाही, तर आरटीओ कार्यालयांच्या आवारातही अशा गाड्या वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी असल्याने गंजून खराब झाल्या आहेत. जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांना या गाड्यांमुळे स्क्रॅप यार्डचे स्वरूप आले असून मांडवा पोलिस ठाण्याच्या आवारात गाड्यांना लागलेल्या आगीच्या घटनेमुळे जप्त केलेल्या गाड्यांमुळे पोलिस ठाण्यांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे.
अपघातग्रस्त वाहने, बेकायदेशीर वाळू उपसा, खनिज वाहतूक, चोरीची वाहने, बेकायदेशीर मद्याची वाहतूक यासह आर्थिक गुन्ह्यात सापडलेल्या व्यक्तींची जप्त केलेली वाहने पोलिस ठाण्याच्या आवारातच पडून आहेत. अलिबागसारख्या पोलिस ठाण्याच्या आवारात पुरेशी जागा नसल्याने या गाड्या रस्त्यावर उभ्या केलेल्या आहेत. यामुळे वाहतूक कोंडीसारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या गाड्यांमध्ये साप, उंदीर घरोबा करून बसत असतात. शिवाय चालू स्थितीतील या गाड्यांमधील इंधनामुळे अनेकदा आगी लागण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे या जप्त केलेल्या गाड्यांमुळे पोलिसांसह नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
--------------------------------------
लिलावाची प्रक्रियाच किचकट
गेल्या अनेक वर्षांपासून रायगड पोलिस विभागाने वाहनांचा लिलाव केलेला नसल्याने पोयनाड, माणगाव, महाड पोलिस ठाण्याच्या आवारात आता भंगार वाहने ठेवण्यास जागा शिल्लक नाही. पोलिस ठाण्याच्या आवारात चोरीची किंवा तत्सम प्रकरणातून जप्त वाहने ठेवण्यात आली आहेत. यातील अनेक वाहने भंगार झाली आहेत. लिलावात विकत घेतलेल्या वाहनांना दुरुस्तीसाठी खूप खर्च करावा लागतो, त्यामुळे लिलावाला नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळतो.
---------------------------------------
दुचाकींची संख्या सर्वात जास्त
नंबर प्लेट नसल्यामुळे ही वाहने वर्षानुवर्षे तेथेच पडून राहतात. मूळ मालक न सापडल्याने पोलिसांचाही नाईलाज असतो. त्यामुळे पोलिस ठाण्यांमध्ये अशा वाहनांची संख्या वाढली आहे. पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही वाहने जप्त केली जातात. काही पोलिस ठाणी नव्या भव्यदिव्य इमारतीत सुरू झाली असली तरी या इमारतीलादेखील जुन्या वाहनांचा विळखा पडला आहे. यामुळे नव्या पोलिस ठाण्यांच्या परिसरालाही भंगार गोदामाचे स्वरूप आले आहे.
------------------------------------
कागदपत्रांअभावी वाहने पडून
मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशातील चोरीची वाहने महाराष्ट्रात आणून स्थानिक दलालांच्या मदतीने कमी किमतीत विकली जातात. या वाहनांची कागदपत्रे नसतात. वाहतूक पोलिसांनी गाडी पकडल्यावर चालकाला परवाना आणि गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली जाते. ती नसल्यास गाडी जप्त केली जाते. मूळ कागदपत्रे दाखवल्यावर दंड भरून गाडी सोडली जाते; परंतु अनेकदा कागदपत्र नसल्याने वाहने सोडवली जात नसल्याने पोलिस ठाण्यातच अशी वाहने पडून आहेत.
-------------------------------------------
न्यायालयीन प्रक्रियेमुळे दुर्लक्ष
जप्त आणि जमा असलेली वाहने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून सोडवून घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून वेळोवेळी केले जाते; परंतु त्यालाही फारसा प्रतिसाद मिळत नाही. पोलिसांकडून ही वाहने खरेदी करण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागत असल्याने अपघातातील जप्त अनेक वाहनांचा नाद मालकांनी सोडून दिल्याचे सांगितले जाते.
--------------------------------------------------
जप्त केलेल्या वाहनांमुळे पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनाही तेथे वावरणे कठीण जाते. ही वाहने मालकांनी सोडवून नेणे अपेक्षित असते; परंतु त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा लिलाव प्रक्रिया राबवणार आहे.
- अतुल झेंडे, अपर पोलिस अधीक्षक, रायगड