महिला सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील

महिला सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील

मनोर / पालघर, ता. ११ (बातमीदार) : महिलांच्या विकासाशिवाय राज्याचा विकास शक्य नाही. महिलांच्या हिताचे व्यापक धोरण आणण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. विश्वास फाऊंडेशन आणि महिला प्रभाग संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला मेळाव्याला मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

महिलांचा संघर्ष प्रेरणादायी असून त्यांचे कर्तव्य त्या चोखपणे पार पाडत आहेत. आजच्या घडीला महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. कोणीही महिला मागे राहू नये, याची जबाबदारी सर्वांची आहे. महिलांसाठी सर्वसमावेशक आणि आधुनिक धोरण आखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. लेक लाडकी योजनेतून मुलीच्या जन्मापासून वयाच्या अठरा वर्षांपर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे. महिलांसाठी ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. माता घर सुरक्षा अभियान, हिरकणी कक्ष, महिलांसाठी महामार्गावर आधुनिक टॉयलेट बांधले जाणार आहेत.

विश्वास फाऊंडेशन आणि महिला प्रभाग संघांच्या वतीने चहाडे गावच्या क्रीडांगणात शनिवारी (ता. ११) महिला सक्षमीकरण मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात पद्मश्री राहीबाई पोपेरे, पालघर जिल्हाधिकारी डॉ. गोविंद बोडके, जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, डहाणूच्या प्रकल्प अधिकारी संजीता मोहपात्रा, विश्वास फाऊडेशनचे अध्यक्ष विश्वास वळवी, मच्छीमार नेत्या ज्योती मेहेर आदी उपस्थित होत्या.

पालघर जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष
आदिवासी जिल्ह्यात मेळावा आयोजित करण्यात आला असून पालघर जिल्ह्यात विकासाची गंगा आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. येत्या काळात एमएमआरडीएच्या माध्यमातून विकासकामांसाठी निधी आणला जाणार असून कृती आराखडा तयार केला जात आहे. अन्य जिल्ह्यांप्रमाणे पालघर जिल्हाही मुख्य प्रवाहात येण्यासाठी सरकार विशेष लक्ष देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

जेवणाचे ताट विषमुक्त असले पाहिजे
लहानपणापासून समाजाच्या हिताचे काम करण्याची इच्छा होती. सेंद्रिय शेतीची आवड होती; परंतु नातवाच्या आजारपणामुळे सेंद्रिय शेतीकडे वळण्याच्या निर्णयाला कुटुंबाने पाठिंबा दिला. आयुष्याची २५ वर्षे गाईच्या गोठ्यात काढली, गोठ्यातच चार मुलांना जन्म दिला. बचत गट सांभाळण्यासाठी शिक्षण नसल्याने अडचणी येत होत्या, त्यावर शाळा सोडलेल्या मुलाला सोबत घेऊन मात करीत पाच बचत गट चालवले. प्रत्येक घरासमोर पारस बाग असली पाहिजे, जेवणाचे ताट विषमुक्त असले पाहिजे, असे आवाहन राहीबाई पोपेरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com