
वाळू उत्खननातील नुकसानग्रस्तांना मदत करणार
कासा, ता. १४ (बातमीदार) : अवैध वाळू उत्खननामुळे नुकसानग्रस्तांना घरांसाठी मदत करू, असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले. डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर मंत्री विखे-पाटील यांनी उत्तर दिले आहे. डहाणू तालुक्यातील नरपड येथील समुद्रकिनाऱ्यावरून अवैध वाळू उत्खनन होत आहे.
डहाणू खाडी ते पारनाका ते नरपडपर्यंत समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अवैध रेतीचे उत्खनन होत असते. समुद्राच्या भरती मुळे पाण्याच्या दबावामुळे गेल्या दोन वर्षात २० ते २५ घरांच्या भिंती कोसळलेल्या आहेत. या घरांचे पंचनामे करून यांना भरपाई मिळेल का? आणि अजूनही अवैध वाळू उत्खनन चालूच आहे त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही होईल का? असा प्रश्न आमदार विनोद निकोले यांनी उपस्थित केला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबद्दल पालघर जिल्हाधिकारी यांना सूचना देऊ, सर्वेक्षण करण्यात येईल. तशी वस्तुस्थिती असेल तर मदत करण्यात येईल. अवैध उत्खननाबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी विधानसभेत स्पष्ट सांगितले.