
भारतरत्नांच्या कार्याला उजाळा
डोंबिवली, ता. १५ (बातमीदार) ः डोंबिवली ग्रंथसंग्रहलयाचा ३४ वा वर्धापनदिन ११ मार्च रोजी साजरा करण्यात आला. या वेळी अक्षत क्रिएशन प्रस्तुत महाराष्ट्रीय भारतरत्न या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि निवेदक अमेय रानडे यांचे होते.
ज्या भारतरत्नांची जन्मभूमी वा कर्मभूमी महाराष्ट्र आहे, अशा निवडक ९ भारतरत्नांचा समावेश करण्यात आला. या भारतरत्नांचे कर्तृत्व, त्यांचे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या विकासातील योगदान आणि त्यांचा कार्यपट अभिवाचन आणि व्हिडीओच्या मध्यमातून उलगडून दाखवला. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, सचिन तेंडुलकर अशा एकूण ९ भारतरत्नांचा समावेश आहे. या कार्यक्रमातील सहभागी कलाकार तपस्या नेवे, आकाश भडसावळे आणि अमेय रानडे यांनी दीड तासाच्या या कार्यक्रमातून रंजकपणे सादरीकरण केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे उपस्थित होत्या. त्यांनी डोंबिवली ग्रंथसंग्रहालयाच्या कार्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रीय भारतरत्न या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग व्हावेत आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. ग्रंथसंग्रहालयाचे सुभाष मुंदडा, विष्णू सोमण, सतीश कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.