
वसई तालुक्यात पायाभूत प्रकल्प राबवा
विरार, ता. १५ (बातमीदार) : बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सर्वसमावेशक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वसई तालुक्यात २५ प्रकल्प राबवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली. आमदार ठाकूर यांची ही मागणी लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आणि योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यासंबंधी एका शिष्टमंडळासह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्प राबविण्याची मागणी केली होती.
या भेटीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड (एमएमबी) आणि महारेल या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी अंमलबजावणी करणाऱ्या संबंधित संस्थांना उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.
--------------------
नवीन उड्डाण पुलांमुळे कोंडीतून सुटका
औद्योगिक हब अशी ओळख असलेल्या परिसरात पाणी साचून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नवघर खाडीचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचा प्रकल्प हा अत्यंत आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे ठाणे, भाईंदर आणि नायगावमध्ये प्रस्तावित असलेल्या रो-रो सेवेचाही मार्ग मोकळा होणार आहे. मनोर-वाडा-आसनगाव या भागांना मुंबई-नाशिक समृद्धी महामार्गाला जोडणे, रेल्वे ओव्हरब्रिज, पूर्व-पश्चिम जोडणारे पूल आणि उड्डाण पूल बांधण्यासाठी आर्थिक मदत या महत्त्वाच्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. तब्बल सात नवीन रस्ते प्रकल्प प्रस्तावित असताना १२ नवीन उड्डाण पूल आणि चार पूर्व-पश्चिम भागांना जोडणारे ओव्हरब्रिज आता प्रवाशांची वाहतूक कोंडीमधून सुटका करण्यासाठी उपयोगात येणार आहेत.