
बस थांब्याला पार्किंगचा विळखा
वाशी, ता. १५ (बातमीदार) : ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली नाका येथे एनएमएमटीचा बस थांबा आहे. मात्र, हा थांबा गॅरेज व्यावसायिक आणि रिक्षाचालकांच्या पार्किंगने संपूर्ण वेढलेला आहे. वाशी, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांना गॅरेजवाल्यांनी गिळंकृत केल्याने बस थांब्यावर बसलेले असताना बस देखील दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांना थांब्याच्या शेडखाली न बसता कडक उन्हाळा झळा सोसत ताटकळत बसची वाट पाहावी लागत आहे. याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ठाणे ते बेलापूर या मार्गावरील ऐरोली नाका सर्वाधिक गर्दीचा परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी यादवनगर, चिंचपाडा, ऐरोली नाका, समता नगर, ऐरोली सेक्टर-१ ते २, ऐरोली गाव, महावितरण कॉलनी येथील नागरिक एसटी आणि एनएमएमटीच्या बसने प्रवास करतात. पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी ऐरोली नाका येथे एनएमएमटीने बस थांबा उभारला आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी चाकरमानी; त्याचबरोबर दुपारी ऐरोली, वाशीकडे जाणारे शालेय विद्यार्थी या बस थांब्याचा वापर करतात. काही महिन्यांपासून बस थांब्यामागे रिक्षा दुरुस्तीचे गॅरेज, वेल्डिंग शॉप आणि इतर व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. या ठिकाणी असणाऱ्या गॅरेजवाल्याकडे रिपेरिंगसाठी आलेल्या रिक्षा या दिवसभर पदपथालगत उभ्या असतात. अनेक बाहेरची वाहने आणि इतर ठिकाणच्या रिक्षा या थांब्यालगत उभ्या असतात. एकंदरीत हा थांबा गॅरेज व्यावसायिक आणि रिक्षावाल्यांनी गिळंकृत केला आहे. बस थांब्याच्या बाजूला वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे प्रवाशांना बस येत असल्याचे दिसत नाही. यासाठी ते रस्त्यावरच उभे राहून बसची वाट पाहत असतात. बस थांब्यालगत अशा पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नवी मुंबई महापालिकेच्यावतीने या परिसराची पाहणी करून विनापरवाना दुकानांवर; तसेच मनमानी पार्क करण्यात येणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात येईल.
- महेंद्र संप्रे, ऐरोली विभाग अधिकारी, नवी मुंबई पालिका