ज्येष्ठ लेखिका लीलाताई शहा यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ लेखिका लीलाताई शहा यांचे निधन
ज्येष्ठ लेखिका लीलाताई शहा यांचे निधन

ज्येष्ठ लेखिका लीलाताई शहा यांचे निधन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : ज्येष्ठ लेखिका व जयसिंगपूर येथील मराठी जैन साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा लीलाताई शहा (वय ८७) यांचे सोमवारी (ता. २०) पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे, पणती असा परिवार आहे. बाल साहित्यापासून ते पर्यावरण, पाणी प्रश्न, अंधश्रद्धा अशा अनेक विषयांवर त्यांनी लेखन केले. कथा, कविता, कादंबऱ्या, ललित साहित्य, वृत्तपत्रीय लेखन त्या शेवटपर्यंत करत होत्या. विविध विषयांवरील ६८ पुस्तके, २०० हून अधिक गाणी त्यांनी लिहिली आहेत. बाल साहित्याचा ३२ पुस्तकांचा त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे. मूळच्या सोलापूरच्या असलेल्या लीलाताई ४० वर्षांपासून डोंबिवलीत वास्तव्याला होत्या.
वयाच्या १६ व्या वर्षापासून त्या लिखाण करत होत्या. १९५२ मध्ये ‘लगीन घाई’ ही त्यांची पहिली कविता वर्तमानपत्रात छापून आली होती. १९८४ मध्ये ‘गीत ज्ञानेश्वर’ हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. साहित्यिक लिखाणामुळे त्यांना कुसुमाग्रज, विजय तेंडुलकर, डॉ. यु. म. पठाण यांचे साहित्यिक मार्गदर्शन मिळाले. सोलापूरच्या ‘श्राविका’ मासिकाच्या संपादक मंडळावर त्या २५ वर्षे होत्या. २०१७ मध्ये अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाचे मानाचे अध्यक्षपद यांनी भूषवले. ताराबाई मोडक बाल साहित्य पुरस्कार, शासनाचे तीन उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, आदर्श डोंबिवलीकर अशा अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित होत्या. एकूण ८५ विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.