
कल्याण परिमंडलात १२७ कोटींचे वीजबिल थकीत
कल्याण, ता. २१ (बातमीदार) : महावितरणच्या कल्याण परिमंडलात आर्थिक वर्ष संपण्यास आठ दिवसांचा कालावधी उरला असतानाही वीज ग्राहकांकडे (कृषिपंप व कायमस्वरूपी वीज खंडित ग्राहक वगळून) १२७ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे थकीत रकमेची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी संबंधित वीज ग्राहकांनी थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कल्याण परिमंडलातील तीन लाख ३१ हजार २७५ ग्राहकांकडे १०० कोटी ३३ लाख आणि तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित केलेल्या ४८ हजार २२५ ग्राहकांकडे २७ कोटी १७ लाख रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. कल्याण पूर्व आणि पाश्चिम व डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ६८ हजार ३५० ग्राहकांकडे नऊ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी आहे. उल्हासनगर एक आणि दोन व कल्याण ग्रामीण विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोनअंतर्गत एक लाख १४ हजार ५४७ ग्राहकांकडे ६८ कोटी ५३ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील एक लाख २६ हजार ७०५ ग्राहकांकडे २० कोटी ६३ लाख; तर पालघर मंडलातील ६९ हजार ८९८ ग्राहकांकडे २८ कोटी ८५ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे.
-----------------------
सुट्टीच्या दिवशीही भरणा केंद्रे सुरू
थकबाकी वसुलीसाठी क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी वाढत्या तापमानातही वसुलीच्या कामात व्यस्त आहेत. वीजबिल भरणा सोयीचा व्हावा, यासाठी सुटीच्या दिवशीही भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगमार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.