
घणसोलीत पाण्यासाठी आंदोलन
तुर्भे, ता.२१ (बातमीदार): घणसोली विभागात सात आठ दिवसांपासून पाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील प्रशासन कुठलीच दखल घेत नसल्याने मंगळवारी (ता.२१) आक्रमक झालेल्या रहिवाशांनी विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करत अभियंत्यांविरोधात कारवाईची मागणी केली.
स्वतःचे मालकीचे धरण असलेल्या नवी मुंबई महापालिका शहरवासीयांना २४ तास पाणी पुरवठा करत असल्याचा दावा नेहमीच करत असते. मात्र, ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’, अशी अवस्था सध्या घणसोलीवासियांची झाली आहे. कारण सात आठ दिवसांपासून घणसोली विभागातील अनंत नगर, शंकरबुवा वाडी, म्हात्रे आळी परिसरात टॅंकर आणि विकतच्या पाण्याचा आधार घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तसेच पाणी पुरवठ्यातील अनियमितपणामुळे महिला वर्गाला विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, याबाबत मनपाकडे वारंवार तक्रारी देखील करण्यात आल्या आहेत. पण अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने येथील संतप्त झालेल्या रहिवाशांनी विभाग कार्यालयात ठिय्या आंदोलन करत अभियंत्यांना हटवण्याची मागणी केली. तसेच येत्या दोन दिवसात पुरवठा पूर्ववत झाला नाहीतर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.