
नवी मुंबईच्या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा
वाशी, ता. २३ (बातमीदार) ः राज्याच्या अर्थसंकल्पावर नगरविकास खात्याच्या मागण्यांवरील चर्चेमध्ये भाग घेताना ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या जिव्हाळ्याच्या मागण्या मांडल्या. या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार गणेश नाईक यांना दिले.
एमएमआरडीएच्या वतीने ऐरोली-काटई उन्नत मार्गाचे काम सुरू असून या मार्गावर मुंबईच्या दिशेने आणि काटईच्या दिशेने चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी मार्गिका तयार करण्यासाठी आमदार गणेश नाईक यांचा पाठपुरावा सुरू आहे. नागपूरच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्येदेखील आमदार गणेश नाईक यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. या दोन्ही मार्गिकांबाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नाईक यांनी केली. नवी मुंबईकरांसाठी चढण्या-उतरण्यासाठी मार्गिका न ठेवल्यास आंदोलनाचा इशारा नाईक यांनी दिला आहे.