समुद्र किनाऱ्यांना वाळूउपचाचे ग्रहण

समुद्र किनाऱ्यांना वाळूउपचाचे ग्रहण

संदीप पंडित, विरार
वसई तालुक्याला मोठा समुद्रकिनारा लाभला असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या किनाऱ्यावर जीवरक्षक नसल्याने पर्यटकांना समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनेकांचे जीव जात आहेत. त्यातच अतिउत्साही पर्यटक समुद्राची माहिती नसतानाही धाडस करायला जात असल्याने त्याचा फटका त्यांना बसत आहे. वसईच्या किनाऱ्यावर होणारा बेसुमार वाळूउपसा, समुद्रकिनाऱ्याची होणारी धूप यामुळे वसईतील समुद्रकिनारे धोकादायक बनू लागले आहेत. मागील आठ दिवसांत तीन पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या आहेत.
वसईतील अर्नाळा, नवापूर, भुईगाव, राजोडी, सुरुची, कळंब, रानगाव आदी समुद्रकिनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. या भागात विविध ठिकाणच्या भागातून पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र मागील काही वर्षांपासून किनाऱ्यालगतच छुप्या मार्गाने वाळूउपसा होऊ लागला आहे. यामुळे किनाऱ्यालगतच्या परिसर अधिक खोल झाला आहे. याचा अंदाज पर्यटकांना येत नाही. यामुळे पर्यटक बुडण्याच्या घटना घडत आहेत. नुकताच वसईच्या कळंब समुद्रकिनारी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याआधीसुद्धा समुद्रकिनारी अनेक पर्यटक बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत; तरीही प्रशासनाकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केला जात नसल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे. सातत्याने पर्यटक बुडण्याच्या घटना घडतात यासाठी सूचना फलक, ध्वनिवर्धकाद्वारे जनजागृती अशा उपाययोजना आखणे गरजेचे आहे. तसे होत नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुसरीकडे काही हौशी पर्यटक कोणतीही बंधने न पाळता मद्यधुंद अवस्थेत समुद्रात जात असल्याने दुर्घटना घडत असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यातच आता थेट समुद्रकिनाऱ्यावर चारचाकी आणि दुचाकी घेऊन जाणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढत आहे. जानेवारी महिन्यात एक टेम्पो कळंबच्या समुद्रात गेला होता. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर जिल्हा प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यांवर आता जीवरक्षक नेमणे गरजेचे आहे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांकडून कर घेणाऱ्या ग्रामपंचायती मात्र सुरक्षेच्या दृष्टीने दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. वसईतील बहुतांश किनाऱ्यांवर ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे पोलिसांबरोबरच ग्रामपंचायतींनीही सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत, तरच समुद्रात जाणारे जीव वाचतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com