सुर्यफुलाच्या लागवडीतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती

सुर्यफुलाच्या लागवडीतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती

विक्रमगड, ता. २६ (बातमीदार) : तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने पावसाळी भातशेती हेच मुख्य पीक घेत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून आधुनिक युगामध्ये येथील शेतकरी दुबार पीक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसत आहे. त्यात प्रामुख्याने पावसाळ्यात भात; तर उन्हाळ्यात भाजीपाला लागवड शेतकरी करत असतात. पण ग्रामीण भागातील शेतकरी खाद्यतेलाच्या पिकांच्या लागवडीकडे वळू लागले आहेत. यात सध्या तालुक्यात सूर्यफुलांची शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
विक्रमगड हा निसर्गरम्य आणि हवामानाच्या दृष्टीने उत्तम तसेच सुपीक प्रकारची जमीन असलेला तालुका आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने पावसाळी भात लागवड तर उन्हाळी कलिंगड, काकडी, भेंडी, चवळी, मिरची अशा प्रकारची पिके घेतली जातात; मात्र गेल्या काही वर्षांपासून विक्रमगड तालुक्यात सूर्यफूल या खाद्यतेल देणाऱ्या पिकाची लागवड शेतकरी उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. या वर्षी तालुक्यात उन्हाळी हंगामात ३०० पेक्षा अधिक हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. तर तालुक्यात यंदा अंदाजित आकडेवारीनुसार ३० ते ३५ हेक्टरवर सूर्यफुलाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे; तर गेल्या वर्षीही २० हेक्टरवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची लागवड केली होती.
सूर्यफूल हे खाद्यतेल देणारे पीक कमी खर्चात मोठे उत्पन्न देते. या पिकाच्या लागवडीचा खर्च व मजुरांची गरजसुद्धा कमी प्रमाणात लागते. त्यामुळे या पिकांपासून थोडी मेहनत घेतल्यास मोठे उत्पन्न मिळते. या पार्श्वभूमीवर विक्रमगड तालुक्यातील माण, ओंदे व इतर गावातील काही शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या मदतीने सूर्यफुलाची लागवड आहे.
......
शेतीसाठी योग्य हवामान
तालुक्यात सूर्यफुलाच्या लागवडीस हवामान व जमीन योग्य असल्याचे लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले. या पिकाला फक्त आठ दिवसांतून एकदा पाणी द्यावे लागते; तर एकदा खत घालावे लागते. या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग येत नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येते. तालुक्यात हवामान व जमीन सूर्यफूल पिकास अनुकूल असल्याने शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या सूर्यफुलांचे मोठ्या प्रमाणात भरघोस पीक आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी दीड एकर जागेत लागवड केलेल्या येणाऱ्या पिकापासून १५ डबे खाद्यतेल म्हणजेच एकडबा पंधरा किलो प्रमाणे २२५ किलो खाद्यतेल मिळेल, असा अंदाज वर्तविला.
सूर्यफुलाच्या बियांपासून तेल गाळून झालेल्या चोथ्याचा (पेंडीचा) उपयोग शेतीत खतासाठी किंवा जनावरांना खाद्य म्हणून वापरता येते, असे माण येथील शेतकरी विलास पाडवी यांनी सांगितले.
----------------------------------------------
विक्रमगड तालुक्यातील हवामान हे उष्ण व दमट असून जमीन मध्यम ते खोल स्वरुपाची आणि योग्य पाण्याचा निचरा होणारी आहे. सूर्यफुल पिकास हवामान व जमीन योग्य असल्याने तालुक्यात सूर्यफुलाची लागवड केल्यास सूर्यफुलाचे मोठे उत्पन्न मिळेल. या सूर्यफुलाच्या उत्पादनातून मोठ्या येथील शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.
- बाळू गोविंद, शेतकरी, ओंदे
..
विक्रमगड : ओंदे गावातील बाळू गोविंद या शेतकऱ्याने शेतात सूर्यफुलाची लागवड केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com