
लघु व मध्यम उद्योगाचे योगदान मोलाचे
मुंबई, ता. २५ ः लघु व मध्यम उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाला आत्मनिर्भर बनवण्यात हे उद्योग मोलाचे योगदान देत आहेत. या उद्योगांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज (ता. २५) येथे केले. लघु आणि मध्यम उद्योजकांची प्रमुख संघटना असलेल्या ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’ या संस्थेचा ३० वा वर्धापन दिवस तसेच इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कारांचे वितरण शनिवारी (ता. २५) मुंबई येथे झाले. त्या वेळी राज्यपाल बोलत होते. कार्यक्रमाला एसएमई चेंबर ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, लार्सन अँड टुब्रोचे कॉर्पोरेट रणनीती व विशेष प्रकल्प अधिकारी अनुप सहाय, चेंबरचे कार्यकारी अधिकारी महेश साळुंखे तसेच राज्यातील विविध लघु व मध्यम उद्योग संस्थांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी लघु आणि मध्यम उद्योजकांच्या ‘इंडिया एसएमई लीडरशिप समिट’ परिषदेला संबोधित करताना राज्यपालांनी कृषी क्षेत्रानंतर सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणारे क्षेत्र लघु आणि मध्यम उद्योग असल्याचे सांगितले. या उद्योगांच्या माध्यमातून महिला तसेच समाजातील विविध उपेक्षित घटकांच्या हातांना रोजगार मिळतो. ग्रामीण भागात समृद्धी आणण्याच्या कार्यात या उद्योगांचे योगदान मोठे आहे. उद्योगांच्या वाढीसाठी संशोधन आणि विकासाला महत्त्व असून महाराष्ट्र शासनाने या दृष्टीने अनेक उपाययोजना केल्या आहेत, असे राज्यपाल म्हणाले.
राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योजक प्रभाकर साळुंके (सुमित ग्रुप पुणे), डॉ. सीमा सैनी (दालमिया शिक्षण समूह) व सुषमा चोरडिया (सूर्यदत्ता शिक्षण समूह) यांना ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार देण्यात आले. युवा उद्योजक अर्पित सिद्धपुरा, ज्येष्ठ उद्योजक ललित चड्ढा, जितेंद्र पटेल, युसूफ कागझी, सोनीर शाह, विशाल मेहता यांसह २० उद्योजकांना इंडिया एसएमई एक्सलन्स पुरस्कार प्रदान करण्यात आले. राज्यपालांच्या हस्ते या वेळी एसएमई चेंबरच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते चेंबरच्या उद्योजकता विकास केंद्राचादेखील आरंभ करण्यात आला.
----
देशाची प्रगती करायची असेल, तर लघू मध्यम उद्योजकांना सक्षम करण्याची गरज आहे. लघु मध्यम उद्योजक हे कामगार वृद्धी, निर्यात वृद्धी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सप्लाय चेन मॅनेजमेंट निर्माण करण्यासाठी मोठे काम करीत आहे. एसएमई चेंबर ऑफ इंडियाच्या माध्यमातून लघु मध्यम उद्योजकांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या एकत्रित करून प्राधान्याने सोडवले जातील.
- नारायण राणे, मंत्री, लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योग