
एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारे परिपत्रक रद्द करा!
मुंबई, ता. २६ : एसटी महामंडळाने १ फेब्रुवारी २०१७ रोजी काढलेले परिपत्रक रद्द करण्याची मागणी राज्य कामगार संघटनेने केली आहे. या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या २०१७ पासून अन्यायकारक बदल्या केल्या असून त्याही रद्द कराव्यात. तसेच जी प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत, अशी प्रकरणेही निकाली काढण्यात यावीत. शिवाय एसटीच्या सर्व विभागांना फेरसूचना देण्यात याव्यात, अशीही मागणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे. बस फेरीदरम्यान प्रवाशांना तिकीट न देता पैसे घेणे किंवा विनातिकीट प्रवासी प्रवास करत आढळल्यास वाहकांवर कारवाई केली जाते; मात्र त्याचे तथ्य तपासले जात नाही. एसटीत काही वेळा प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे चुकून एखाद्याला तिकीट न देताच पैसे घेतले जाण्याचे प्रकार होतात; मात्र वास्तविकता समजून न घेता एसटी कर्मचाऱ्यांवर सर्रास कारवाई केली जाते. त्यामुळे हे परिपत्रक रद्द करण्याची मागणी राज्य एसटी कामगार संघटनेने केली आहे.