रोजगारासाठी कुशल कार्यबलाची गरज!

रोजगारासाठी कुशल कार्यबलाची गरज!

नवीन पनवेल, ता. २७ (वार्ताहर) : देशातील अनेक विद्यापीठे सुशिक्षित बेरोजगारांची निर्मिती करतात. अनेकदा अभियांत्रिकी करूनही तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. या पार्श्वभूमीवर राज्यात रोजगारासाठी कुशल कार्यबल निर्मिती आवश्यक असल्याचे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. पनवेल येथे महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाच्या इमारतीचे भूमिपूजन राज्यपालांच्या हस्ते सोमवारी (ता. २७) करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेश बालदी, कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आदी उपस्थित होते.

सर्व क्षेत्रांत महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यांनासुद्धा कौशल्य रोजगारनिर्मिती करून देण्याच्या अनुषंगाने पावले उचलावीत. महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठाने प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये कौशल्यप्रणीत मनुष्यबळाची निर्मिती होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

अमेरिका, इंग्लंड, चीन यांसारख्या देशांनी तेथील लोकसंख्येचा योग्य वापर करून कौशल्य विकास व तंत्रज्ञानाला चालना दिली. आयटीआय आणि उद्योगाची मोठ्या प्रमाणावर सांगड घालणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याने पुढच्या दहा-पंधरा वर्षांमध्ये उद्योग आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योग आणि सेवा पुरवठा क्षेत्रातील चीनच्या एकाधिकारशाहीला पर्याय शोधण्यास जगातील सर्वच देश, उद्योजक प्रयत्न करत आहेत. यात सर्वांत जास्त संधी आणि शक्ती केवळ भारताकडे आहे, हे ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास, मानव संसाधन यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रशिक्षित मानव संसाधन ही आवश्यक बाब आहे आणि या विभागाची जबाबदारी खूप मोठी असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कलागुणांचा विकास आवश्‍यक
राज्यपालांनी देशामध्ये कौशल्यपूर्ण उद्योग आणि व्यवसायाचा आढावा घेतला. बदलत्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी युवा रोजगाराबाबत चिंता व्यक्त केली. यासाठी कौशल्य प्रशिक्षण अत्यंत प्रभावीपणे देण्याची गरज असल्याचे सांगत महाराष्ट्रात जे नवीन उद्योग येऊ घातले आहेत, त्यांना प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवण्याच्या अनुषंगाने कौशल्य प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना राज्यपालांनी सरकारला दिल्या. आदिवासींमध्ये अनेक कलागुण असतात. त्यांच्या कौशल्याचा विकास करून ते निर्माण करत असलेल्या वेगवेगळ्या उत्पादनांचे ब्रॅण्डिंग, मार्केटिंग आणि पॅकिंग करण्याची आवश्यकता असल्याचेही रमेश बैस म्हणाले.

नवी मुंबईत स्टार्टअप हब
उद्योगासह सेवा पुरवठाही महत्त्वाची आहे. त्याअनुषंगाने विविध कौशल्य विकासाच्या संधी येणाऱ्या काळात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. रत्नागिरीत एक वास्तू तयारच आहे, त्याचे लवकरच कौशल्य विकास उपकेंद्र म्हणून उद्‍घाटन होणार आहे. आयटीआयसाठी उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. निधीची कमतरता भासू देणार नाही. नवी मुंबईत लवकरच स्टार्टअप हबसुद्धा सुरू करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com