मध्यरात्रीनंतर प्रदूषणाचे आक्रमण

मध्यरात्रीनंतर प्रदूषणाचे आक्रमण

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २८ ः तळोजा एमआयडीसीतील काही कंपन्यांकडून रात्रीच्या वेळेस धूर सोडण्याचे प्रमाण वाढले आहे. या प्रकारामुळे खारघरमधील रहिवासी हैराण झाले असून रात्री १२ नंतर मोठ्या प्रमाणात धुराचे लोट हवेत पसरत असल्याने खिडक्या बंद करण्याची वेळ खारघरमधील रहिवाशांवर येत आहे.
खारघर नोडच्या कडेला तळोजा एमआयडीसी वसलेली आहे. या एमआयडीसीतील केमिकल कंपन्यांमधून रात्रभर घातक वायू सोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या धुरामुळे खारघरच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हिवाळ्यात रात्रीच्या वेळेस सोडलेल्या धुराची लाट डोळ्यांना दिसेल इतकी होती, परंतु आता उन्हाळ्यातही एमआयडीसीतील कंपन्यांनी धूर सोडण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. त्यामुळे महिनाभरापासून खारघरमधील सेक्टर ३०, २२, २५, ३५, ३६, ओवे गाव, पेठपाडा गाव, रांजनपाडा, इनामपुरी, मुर्बी, खुटूकबांधण, रोहिंजण, सत्यसाईबाबा ट्रस्ट हॉस्पिटल, आरएएफ भागात खराब मासळीला येणाऱ्या दुर्गंधीप्रमाणे वास येत आहे. विशेष म्हणजे रात्री ११ नंतर खारघरमधील सेंट्रल पार्कपासून पुढील परिसरात डोळ्यांना दिसेल इतक्या अंतरावर धुराची चादर पसरत असल्याने मध्यरात्रीनंतर ते अगदी पहाटे ६ वाजेपर्यंत प्राणघातक वायूची लाट पसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे रोज पहाटे चालायला घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने अशा परिस्थितीत अनेकांना पहाटे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.
------------------------------------
‘ग्रीन खारघर’फक्त कागदावरच
- पांढरेशुभ्र पाण्याचे फेसाळणारे धबधबे, दाट धुक्यात बुडालेले डोंगर, हिरव्या रंगाचा शालू पांघरलेले निसर्गसंपन्न खारघर पावसाळ्यात दिसतो. अगदी खारघर शहराच्या प्रवेशद्वारावर म्हणजे उत्सव चौकाच्या पाठीमागील डोंगरामुळे खारघरमध्ये प्रवेश केल्यावर गारेगार वाटायचे. हिंदी सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या सुंदर निसर्गदृश्याचा भास खारघरमध्ये आल्यावर होत होता.
- काही बड्या विकसकांकडून याच निसर्गाच्या धर्तीवर ग्रीन खारघर असे ब्रँडिंग करून स्वतःच्या आलिशान गृहप्रकल्पांच्या जाहिराती केल्या जात आहेत; मात्र वर्षभरात तळोजा एमआयडीसीतील कंपन्यांकडून होत असलेल्या प्रदूषणामुळे खारघरची प्रतिमा मलीन झाली आहे.
---------------------------------
एमपीसीबी निद्रावस्थेत
महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या तीन माकडांप्रमाणे एमपीसीबीची काहीशी अवस्था झाली आहे. हवेत सोडलेला धूर या संस्थेला दिसत नाही. प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. तसेच प्रदूषणाबद्दल नागरिकांचे आक्षेपही एमपीसीबीला ऐकायला येत नाहीत. त्यामुळे खारघरमधील नागरिक पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत.
---------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com