
दया नायक पुन्हा मुंबई पोलिस दलात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : महाराष्ट्र पोलिस दलातील आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश गृह विभागाने मंगळवारी रात्री जारी केले. या आदेशानुसार एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची पुन्हा एकदा मुंबई पोलिस दलात बदली करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकात कार्यरत असलेल्या दया नायक यांच्यासह तीन पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने काढले आहेत. नायक यांच्यासह आठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत पत्रक जारी करण्यात आले आहे. २०२१ मध्ये दया नायक यांची बदली गोंदिया येथे करण्यात आली होती. प्रशासकीय बदलीचे कारण त्या वेळी पुढे करण्यात आले होते; परंतु बदलीच्या आदेशाला दया नायक यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण म्हणजेच मॅटमध्ये आव्हान दिले होते. मॅटने बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यानंतर दया नायक एटीएसमध्ये रुजू झाले. दया नायक यांच्यासह दौलत साळवे, ज्ञानेश्वर वाघ यांचीही दहशतवादविरोधी पथकातून मुंबई पोलिस दलात बदली करण्यात आली आहे. नागिन काळे, कैलास बोंद्रे, अशोक उगले, रमेश यादव, मुरलीधर करपे यांची बदली रद्द करण्यात आली आहे.
...
नायक यांची कारकीर्द
दया नायक १९९५ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झाले. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागात काम सुरू केले. दया नायक हे शर्मांच्या एन्काऊंटर पथकात होते. त्यांनी १९९६ मध्ये पहिला एन्काऊंटर केला होता. त्यांनी ८० हून अधिक गुंडांचे एन्काऊंटर केल्याची माहिती आहे. त्यामुळेच त्यांना एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख मिळाली. दरम्यान, बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना २००६ मध्ये पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आले होते. एसीबीने त्यांना अटकही केली; मात्र पुरावे सादर करता न आल्याने त्यांना क्लीनचिट देण्यात आली. २०१२ मध्ये दया नायक यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. आधी त्यांची नियुक्ती मुंबईत, नंतर नागपूरला झाली; मात्र तिथे रुजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. २०१६ मध्ये निलंबनाची कारवाई मागे घेत त्यांची मुंबईत नियुक्ती करण्यात आली.