
शहापूरात राज्यस्तरीय कवी संमेलन
खर्डी, ता.२८(बातमीदार) : स्वराज्य लेखणी मंच आणि माझी लेखणी साहित्य मंचतर्फे शहापूर तालुक्यातील वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणे येथे मंगळवारी कवी संमेलन पार पडले. या वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शंभरपेक्षा जास्त कवी कवयित्रींनी सहभाग घेतला. उपस्थित मान्यवर, साहित्यिक, विद्यापीठातील साधक यांनी भक्तिगीते गात, फुगड्या खेळत, वाजत गाजत काढलेली ग्रंथदिंडी या संमेलनाचे आकर्षण ठरली.
उदघाटन सोहळ्यानंतर पत्रकार काशिनाथ तिवरे, स्वागताध्यक्ष डॉ. कैलास महाराज निचिते, उद्घाटक कवी भगवान जाधव यांचे साहित्यिक विचार आणि संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण उपस्थितांसाठी साहित्यिक मेजवानी ठरली. या वेळी महाराष्ट्र साहित्य दर्पणचे संपादक कवी गुलाबराजा फुलमाळी, कवयित्री सुनिता कपाळे, कवयित्री प्रीती वानखेडे यांना स्वराज्यरत्न तर कवयित्री स्वप्ना बेलदार, कवयित्री अमृता संखे यांनी लेखणी सम्राज्ञी पुरस्काराने गौरवण्यात आले. कवी अन्वर मिर्झा, कवी रमेश तारमळे, कवी महेश धानके, कवी गंगाराम ढमके, कवी संजय गगे खरीडकर, कवयित्री डॉ. तरूलता धानके, कवी एकनाथ देसले या निमंत्रितांचे कवी संमेलन साहित्य रसिकांसाठी पर्वणीच ठरली. प्रकाश फर्डे व संदीप जगताप यांनी आयोजित केलेल्या या कविसंमेलनाचे सर्वत्र कौतुक होत असून या संमेलनासाठी डॉ. संतोष गायकवाड, मनोज विशे, विवेक नार्वेकर, किशोर कुडव, मनोज पानसरे, रवींद्र यशवंतराव, शरद पांढरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सातपुते, राजश्री मराठे,अनिल केंगार तर प्रास्ताविक आयोजक प्रकाश फर्डे यांनी केले.