
भाजपविरोधात प्रदेश काँग्रेस आक्रमक
नालासोपारा, ता. ३१ (बातमीदार) : भाजपचे मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून देशाची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यांची आम्ही पोलखोल करून देशातील जनतेला सावध करणार, असा इशारा प्रदेश कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री नसीम खान यांनी मोदी सरकारला दिला. आज (ता. ३१) त्यांनी भाजप, मोदी सरकारवर ताशेरे ओढले.
वसई पूर्व सातिवली रेंज नाका येथील एका हॉटेलमध्ये नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. या वेळी काँग्रेस प्रवक्ता संदीप पांडे, वसई-विरार जिल्हाध्यक्ष ओनिल अल्मोडा, वसई-विरार जिल्हा काँग्रेस, प्रभारी जोजो थॉमस, पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील आदी उपस्थित होते.
केंद्रातील मोदी सरकारविरोधात प्रदेश काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. नसीम खान म्हणाले की, देशाची लोकशाही संपुष्टात येत आहे. बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचाराने देश होरपळत आहे. याविरोधात राहुल गांधी लढा देत आहेत. त्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून राजकीयदृष्ट्या संपवण्याचे प्रयत्न त्यांचे विरोधक करत आहेत, पण हा लढा थांबणार नाही. अदाणी-मोदी यांचे हितसंबंध आहेत आणि ते पुराव्यानिशी राहुल गांधी यांनी जनतेसमोर आणल्याने त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.