रस्त्यातील विद्युत खांब धोकादायक

रस्त्यातील विद्युत खांब धोकादायक

वाडा, ता. ५ (बातमीदार) : वाडा शहरातील मुख्य बाजापेठेतून वाडा-नाशिक हा राज्य मार्ग गेला आहे. या मार्गाचे तीन वर्षांपूर्वी रुंदीकरण करण्यात आले आहे. रुंदीकरण करतेवेळी रस्त्याला अडथळा ठरणारे विद्युत खांब आजतागायत हटवण्यात आलेले नाहीत. यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वारंवार सूचना, तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण कंपनी दखल घेत नसल्याने येत्या १५ दिवसांत येथील विद्युत खांब हटवण्याची कार्यवाही सुरू केली नाही तर या दोन्ही कार्यालयांवर मोर्चा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिला आहे.
वाडा बाजारपेठेतून जाणारा खंडेश्वरी नाका ते परळी नाका या एक किलोमीटर लांबीच्या राज्य महामार्गावर नेहमीच वाहतूककोंडी होत असते. येथील वाहतूककोंडीची समस्या सुटण्यासाठी या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. हे रुंदीकरण करतेवेळी या मार्गात अडथळा ठरणारे विद्युत खांब काढणे क्रमप्राप्त होते; मात्र गेल्या तीन वर्षांत याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही.

---------------------
खांब हटवण्यासाठी कारणे
खांब हटवण्यासाठी महावितरण कंपनीकडे विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम खात्याने हे खांब हलवण्यासाठी खर्चाची तरतूद करावयाची आहे. त्यांच्याकडून ही तरतूद होत नाही तोपर्यंत हे काम हाती घेता येत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे याबाबत विचारणा केली असता हे खांब हटवण्यासाठी येणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक महावितरण कंपनीकडे वारंवार मागितले गेले आहे, पण अंदाजपत्रक मिळत नाही असे सांगण्यात आले.

----------------
वाडा शहरातील रस्त्यावरील विद्युत खांब हटवण्यासाठीचे ८४ लाखांचे अंदाजपत्रक २०१७ सालीच सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. खांब हलवण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.
- आर. आर. कुमावत, कनिष्ठ अभियंता, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com