बॅरेज धरणावर पोहण्यास मज्जाव

बॅरेज धरणावर पोहण्यास मज्जाव

बदलापूर, ता. १५ (बातमीदार) ः बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बॅरेज धरणावर पोहण्यासाठी तरुणांची दररोज मोठी गर्दी होत आहे. उन्हाने काहिली होत असल्याने हे तरुण धरणावर पोहायला जात आहेत; पण बॅरेज धरणावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य प्रवेशद्वार बंद आहे. तेथे पोहण्यास मज्जाव आहे; परंतु तरुण बदलापूर गावातून कच्च्या रस्त्याने, अवघड वाटेने या धरणात पोहायला येत आहेत. हे लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपअभियंता माधुरी पाटील व पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन मुलांनी पोहण्यास येऊ नये, अशी ताकीद दिली.

बदलापूर शहराला पाणीपुरवठा करणारे बॅरेज धरण हे इंग्रजांच्या काळात बांधण्यात आले होते. मात्र २००५ मध्ये आलेल्या महापुरात या धरणाच्या भिंती तुटून वाहून गेल्या. त्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पाणी अडवण्यासाठी कठडे बांधण्यात आले. अडवलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून जलशुद्धीकरण करत हे पाणी शहरात पिण्यासाठी सोडले जाते. हे धरण उल्हास नदीवर असल्याने तसेच धरणाच्या परिसरातील भाग अत्यंत खोल असल्याने याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून बुडून मृत्यू झालेल्या घटनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी मासेमारी व पोहण्यासाठी पोलिस प्रशासन तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून मज्जाव केलेला आहे. मात्र, या गोष्टीचे गांभीर्य नसल्याने तसेच उन्हाळ्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी, तरुणाई हे नियम झुगारून बॅरेज रस्त्याकडून धरणावर जात आहेत. सध्या उन्हाचा कडाका वाढल्यामुळे पोहायला जाणाऱ्या तरुणांची व लहान लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. मुलांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, हे लक्षात घेत उपअभियंता माधुरी पाटील यांनी पोलिसांना सोबत घेत धरण गाठले आणि तरुणांना सक्त ताकीद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com