वार्तापत्र

वार्तापत्र

भाजपचे मिशन २०२४ ची मोर्चेबांधणी

भगवान खैरनार

भाजपने २०२२ पासूनच आगामी २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीपासून ते गावपातळीवरच्या बुथ प्रमुखापर्यंतच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत भाजपने प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात बुथ सशक्तीकरण अभियान सुरू केले आहे. शत-प्रतिशत भाजप असाच काहीसा नारा भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून दिला जात आहे. भाजपने महाराष्ट्रात ४८ लोकसभा आणि विधानसभेच्या २०० जागांचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मिशन २०२४ ची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पालघर जिल्ह्यात भाजप मागील पंचवार्षिकमध्ये प्रथम क्रमांकाचा पक्ष होता. जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार आणि एक खासदार निवडून आले होते. तसेच जिल्हा परिषदेमध्येही वर्चस्व होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. जिल्ह्यात एक लोकसभा आणि सहा विधानसभा मतदासंघात भाजपचा एकही आमदार अथवा खासदार निवडून आलेला नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्यातून भाजपचे विधानसभा आणि लोकसभेत अस्तित्वच राहिले नाही.
राज्यात शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीने सत्तांतर झाले आणि भाजप-शिवसेनेने सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. पालघर जिल्हा पालकमंत्री पद भाजपने आपल्याकडे घेत कुशल संघटक असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या दहा महिन्यांच्या कार्यकाळात त्यांनी पालघरचा सागरी, डोंगरी आणि नागरी भाग वेगवेगळ्या माध्यमातून पिंजून काढला आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उभारी दिली आहे. जिल्ह्यात भाजपला गतवैभव प्राप्त करण्यासाठी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.
भाजपने प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचणारी बुथनिहाय कार्यकर्त्यांची फळी उभी केली आहे. जिल्ह्यात बुथ सशक्तीकरण अभियान भाजपने सुरू केले आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपने व्यूहरचना आखत, भाजपचा कार्यकर्ता प्रत्येक मतदारांपर्यंत कसा पोहचेल असे नियोजन करण्यात आले आहे. कुठलाही गाजावाजा न करता, आता भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांची कार्यकारिणी यांनी जिल्हाभर फिरून बैठका घेत बुथ सशक्तीकरणाचा आढावा घेणे सुरू केले आहे.
गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी परंपरागत भाजपची असलेली पालघरची जागा भाजपने शिवसेनेला सोडली होती. त्यानंतर पालघर जिल्ह्यात भाजपच्या अधोगतीला सुरुवात झाली होती, असे म्हटले जाते. आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजमध्ये युती राहिली नसल्याने पालघरच्या जागेवर पुन्हा एकदा झेंडा रोवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आतापासूनच तयारीला लागले आहेत. पालघरच्या ग्रामीण भागातील चार विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली असली तरी नालासोपारा आणि वसई विधानसभा क्षेत्राकडे मात्र भाजपच्या वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. पक्षातर्फे संपूर्ण पालघर जिल्ह्यात बुथ स्तरावर सशक्तीकरण बैठका घेणे सुरू करण्यात आले असून संघटनात्मक तयारीचा आढावा घेतला जात आहे. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची भाजपने आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. इतर राजकीय पक्षांच्या राजकीय आघाडीवर सामसूम असताना भाजपने मात्र पालघर लोकसभा आणि ग्रामीण भागातील डहाणू, पालघर, विक्रमगड आणि बोईसर विधानसभा मतदारसंघातील गावागावांत जाऊन प्रत्येक बुथवरील तयारीचा लेखाजोखा घेण्यास सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com