
भर उन्हात प्रवाशांना मनस्ताप
वाशी, ता. १७ (बातमीदार)ः ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली नाका येथील नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेचा बस थांबा आहे. या थांब्याच्या पाठीमागे असणारे गॅरेज व्यावसायिक, तसेच रिक्षाचालकांकडून विनापरवाना वाहनांची पार्किंग केली जाते. त्यामुळे वाशी, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांना भर उन्हातच बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे.
ठाणे ते बेलापूर या मार्गावरील ऐरोली नाका सर्वाधिक गर्दीचा परिसर ओळखला जातो. या ठिकाणी यादवनगर, चिंचपाडा, ऐरोली नाका, समता नगर, ऐरोली सेक्टर-१ ते २, ऐरोली गाव, महावितरण कॉलनी येथील नागरिक एसटी आणि एनएमएमटीच्या बसने प्रवास करतात. पनवेलच्या दिशेने जाण्याकरीता ऐरोली नाका येथे एनएमएमटीने बस थांबा उभारला आहे. ऐरोली, वाशीकडे जाणाऱ्या चाकरमान्यांबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी हा थांबा उपयुक्त ठरत आहे. मात्र, काही महिन्यांपासून बस थांब्यामागे रिक्षा दुरुस्तीचे गॅरेज, वेल्डींग शॉप आणि इतर व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत. त्यामुळे प्रवाशांवर रस्त्यावर उभे राहण्याची वेळ येत आहे.
----------------------------
नवी मुंबई महापालिकेच्यावतीने परिसराची पाहणी केली जाणार आहे. तसेच विनापरवाना दुकानांवर, तसेच मनमानी पद्धतीने पार्क करण्यात येणाऱ्या रिक्षांवर कारवाई करण्यात येईल.
- महेंद्र संप्रे, विभाग अधिकारी, ऐरोली, नवी मुंबई महापालिका