७५० मुंबईकरांकडून ३० हजार क्षयरुग्ण दत्तक!

७५० मुंबईकरांकडून ३० हजार क्षयरुग्ण दत्तक!

मुंबई, ता. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत टीबीमुक्त भारताचे लक्ष्य घोषित केले आहे. ते साध्य करण्यासाठी समाजाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. समाजाच्या सहकार्यासाठी ‘निक्षय मित्र’ योजना सुरू करण्यात आली आहे. त्या योजनेंतर्गत ७५० मुंबईकरांनी ३० हजारांहून अधिक टीबी रुग्णांना ‘निक्षय मित्र’ म्हणून दत्तक घेतले आहे. ते क्षयरुग्णांना किमान सहा महिने पौष्टिक आहार देतील.

मुंबईत ४० हजार क्षयरुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. त्यापैकी ३१ हजार जणांनी देणगीदारांकडून मदत घेण्यास संमती दिली आहे. महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या, की प्राथमिक अवस्थेत क्षयाच्या आजाराशी लढण्यासाठी पोषणाची भूमिका मोठी असते. आजाराशी लढा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे ‘निक्षय मित्र’ सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या रुग्णांना रेशन किट देऊन दाते बनले आहेत.

महापालिकेच्या क्षयरोग नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. वर्षा पुरी म्हणाल्या, की वॉर्ड स्तरावरील वैद्यकीय अधिकारी जनजागृतीदरम्यान संवादातून प्रोत्साहन देऊन ‘निक्षय मित्र’ म्हणजेच दान दाता बनण्यास प्रवृत्त करत आहेत. आतापर्यंत ७५० जणांनी संवादातून ‘निक्षय मित्र’ होण्यासाठी संमती दिली असून ३० हजारांहून अधिक टीबी रुग्णांना दत्तक घेतले आहे. ७५० ‘निक्षय मित्रां’नी पौष्टिक आहार देण्यास संमती दिली आहे. सर्वसामान्यांपासून स्वयंसेवी संस्था आदींचा त्यात समावेश आहे, असे त्यांनी सांगितले.

अशी आहे दत्तक प्रक्रिया
डॉ. वर्षा पुरी यांनी सांगितले, की दाते किंवा निक्षय मित्र वॉर्डाशी संपर्क साधू शकतात किंवा थेट सरकारी वेबसाईटवर जाऊन दाता म्हणून नोंदणी करू शकतात. त्यानंतर डीटीओ दात्याला कॉल करतो आणि त्यांना तपशील देतो. त्यांना किती रुग्ण दत्तक घ्यायचे आहेत ते विचारतो आणि त्यानंतर त्याबाबतची कार्यवाही सुरू होते.

९०० रुपयांपर्यंत पौष्टिक किट
टीबी रुग्णांना पौष्टिक आहार देण्यासाठी रेशन किटची किंमत ५०० ते ९०० रुपये प्रतिमहिना आहे. किटमध्ये तेल, तृणधान्ये, कडधान्ये, गूळ आणि प्रोटिन बिन्ससारख्या वस्तूंचा समावेश आहे. जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार क्षयरुग्णांना दिला जाणारा पौष्टिक आहार दात्याने दिलेल्या रकमेवर अवलंबून असतो.

मदतीसाठी आवाहन
केवळ क्षयरुग्णच नव्हे, तर त्याचे संपूर्ण कुटुंबच त्या आजाराशी लढा देत असते. एक ते दोन वर्षे उपचार सुरू राहत असल्याने संपूर्ण कुटुंब अडचणीतून जाते. इथेच ‘निक्षय मित्र’ उपयोगी ठरू शकते. आम्ही रहिवासी, स्वयंसेवी संस्था, कंपन्या किंवा व्यक्तींना पुढे येण्याची विनंती करतो. रुग्णांना त्यांच्या आर्थिक क्षमतेच्या आधारे सल्ला द्या आणि त्यांना दत्तक घ्या, असे आवाहन डॉ. मंगला गोमारे यांनी मुंबईकरांना केले.

तीन प्रकारे करता येते मदत
- ‘निक्षय मित्र’ पोषण आहारासाठी रेशन किट देऊ शकतात
- ‘निक्षय मित्र’ टीबी निदान, रक्त चाचण्या, एमआरआय, सिटी स्कॅन आणि इतर चाचण्यांसाठी मदत करू शकतात
- देणगीदार नोकरीच्या मार्गाने व्यावसायिक आधार देऊ शकतात किंवा कमी उत्पन्न गटातील रुग्णांच्या कुटुंबीयांना मदत करू शकतात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com