एफडीएची करडी नजर, उन्हाळ्यात अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम

एफडीएची करडी नजर, उन्हाळ्यात अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम

काहिलीमुळे शीतपेये रडारवर!
विक्रेत्यांवर ‘एफडीए’ची करडी नजर; विशेष तपासणी मोहीम राबवणार

मुंबई, ता. १८ : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कडक उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी शीतपेय वा सरबत पिण्याकडे मुंबईकरांचा कल वाढू लागला आहे. शीतपेये वा थंडगार सरबताने थोडा दिलासा मिळत असला तरी त्याचे दुष्परिणामही आहेत. ते टाळण्यासाठी मुंबईचे अन्न व औषध प्रशासन पुन्हा सज्ज झाले आहे. सरबतांसाठी वापरण्यात आलेले पदार्थ किंवा पाणी योग्य पद्धतीने हाताळले गेले आहे का किंवा पुरेशी स्वच्छता राखली गेली आहे का, याची तपासणी आता केली जाणार आहे.

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेत शरीरास हानिकारक अशा शीतपेयांची विक्री करणाऱ्यांवर आता अन्न व औषध प्रशासन विभागाची नजर असणार आहे. शीतपेय शरीरास अपायकारक असल्याचे नमुन्यात स्पष्ट झाल्यास संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यांचा परवानाही रद्द करण्यात येतो. प्रसंगी अशा दुकानदारांविरोधात न्यायालयात खटलाही दाखल करण्यात येतो, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे यांनी दिली.

उन्हाळ्यात शीतपेयांच्या मागणीत वाढ होते. रस्त्यावरील शीतपेये वा सरबत प्यायल्याने मात्र शरीराला हानी पोहचू शकते. त्यामुळेच एफडीएने आता विशेष खबरदारी घेतली आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात अन्न व औषध प्रशासनाकडून अशा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो. यंदाही प्रशासन विभागाने त्याविरोधात मोहीम हाती घेतली आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील शीतपेय वा सरबत विक्रेत्यांकडून विविध पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. विक्रेत्यांकडील फळे, साखर, बर्फ इत्यादी पदार्थांचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. दुकानातील स्वच्छतेचा आढावाही तपासणीदरम्यान घेतला जात आहे.

दरम्यान, तपासणीसाठी घेण्यात आलेले नुमने शरीरास हानिकारक पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले तर संबंधित दुकानदारावर वा विक्रेत्यावर रीतसर कारवाई करण्यात येते, असेही केकरे यांनी सांगितले.

अशी होते दंडात्मक कारवाई
- परवाना नसेल तर तो घेण्याची सूचना केली जाते
- प्रसंगी दहा लाखांपर्यंत दंड
- १५ दिवस ते महिनाभरासाठी परवाना रद्द
- तपासणीत शरीरास हानिकारक पदार्थ असल्याचे सिद्ध झाले तर संबंधितांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला जातो

शीतपेय वा जंक फूड खाणे टाळा
मुंबईचा पारा वाढत असून पुढील काही दिवसांत तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे चक्कर, अशक्तपणा, अतिसार इत्यादी गोष्टींचा त्रास होऊ शकतो. दुपारी १२ ते ४ दरम्यान शक्यतो उन्हात जाणे टाळावे. स्वतःची काळाजी घेत पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत बाळगावी. सतत पाणी पीत राहावे. उन्हात छत्री घेऊनच जा. विशेष म्हणजे वाढत्या तापमानात रस्त्यावरील फळांचे सरबत वा कुठल्याही प्रकारचे शीतपेय पिणे टाळावे. जंक फूडही टाळावे, असा सल्ला महापालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com